- पुरावा सोबत नसल्यास होणार कारवाई
वाशिम, दि. १८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार कालावधी समाप्त होत असून मतदान प्रक्रिया सुरु होण्यासाठी आता केवळ ४८ तास शिल्लक आहेत. त्यामुळे जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत भरारी पथके (एफएसटी), स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी) यांची कार्यवाही गतिमान करण्यात आली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवून वाहनांची अचानक तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी ५० हजार रुपयांवर रोख रक्कम जवळ बाळगायची असल्यास अथवा घेऊन जायची असल्यास त्याबाबतचा पुरावा सुद्धा सोबत ठेवणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हृषीकेश मोडक यांनी कळविले आहे.मतदारांना लाच देणे किंवा धमकी देणे, धाकदपटशा करणे हे केवळ निवडणूक अपराध नसून ते भारतीय दंड संहितेनुसार सुद्धा दंडनीय गुन्हा ठरविण्यात आला आहे. म्हणून प्रत्येकाने अशा कृतीपासून दूर रहावे. अशा प्रकारांची माहिती तत्काळ निवडणूक प्रशासनाला कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.




