आमगांव : आमगांव नगरपरिषदेच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांवर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. परंतु सकाळपासून सायंकाळपर्यंत बसस्थानक चौक, गांधी चौक, कामठा चौक, आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यांच्या मधोमध गाई व पाळीव प्राण्यांनी आपला ठिय्या मांडल्याने वाहनचालकांना (Driver) कमालीचा त्रास होत आहे.आमगांव येथील या मुख्य रस्त्यांवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांचा (Animals) त्रास सहन करावा लागतो. पशुमालकांचे (Animal Owner) याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे हे प्राणी दिवसभर रस्त्याच्या मधोमध बसलेले असतात. वाहनचालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना (Principal) याबाबत माहिती दिली. परंतु आजपर्यंत, रस्त्याच्या मधोमध बसणाऱ्या पाळीव प्राण्यांवर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आमगांव शहराच्या मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांच्या मालकांवर त्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी विनंती जनतेने केली आहे.
अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पारधी लाच घेतांना अटक
गोंदिया,दि.०४ः गोंदिया तालुका एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातंर्गत येत असलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती गुलाबो पारधी यांना सोमवार(दि.३०) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंदाजे ९०० रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे.सदर महिला अंगणवाडी पर्यवेक्षिकेला लाच घेतांना अटक करण्यात आल्याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय,जि.प.गोंदिया यांना पत्राद्वारे कळविण्यात आली असून संबधित विभागाने अंगणवाडी पर्येवेक्षिका श्रीमती पारधी यांच्यावर निलबंनाची कारवाई सुरु केली आहे.
एमपीएससीत रितिका दोनोंडेची उत्तुंग भरारी
गोंदिया,दि.०४ः सालेकसा तालुक्यातील साखरीटोला/सातगाव येथील रितिका प्रभाकर दोनोंडे हिने एमपीएससी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करून गावासह आईवडिलांचे नाव मोठे केले. त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मेहनत व जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे, हे रितिकाने राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करून सिद्ध केले. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पीडब्लूडी विभागात वर्ग 2 पदी तिची नियुक्ती झाली आहे. या यशाचे श्रेय तिने वडील प्रभाकर दोनोंडे, आई मंजुषा दोनोडे आणि मार्गदर्शक शिक्षक व सततच्या अभ्यासाला दिले. निरंतर अभ्यासामुळेच ही मजल मारल्याचे एमपीएससी परीक्षा विजेती रितिका दोनोंडे हिने प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. भविष्यात गोंदिया जिल्हा व सालेकसा तालुक्यात काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच आवडेल. तसेच तालुक्याचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ग्रामपंचायतींना दिल्या प्रत्यक्ष भेटी
राज्यात गेल्या अडीच वर्षात ४२७ पोलीसांचा मृत्यू;२५ पोलीसांनी केली आत्महत्या
७५ पोलीसांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दर मंगळवारी आणि शुक्रवारी दोन तास कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा-मुख्यमंत्री
मुंबई:-राज्यात गेल्या अडीच वर्षांत ४२७ पोलिसांचा मृत्यू झाला असून यात २५ आत्महत्यांचा समावेश आहे. ७५ पोलीसांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांमध्ये वाढत असलेल्या मानसिक तणावामुळे ही स्थिती उद्भवली असल्याचे स्पष्ट होताच राज्य सरकारने तातडीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील प्रत्येक पोलिस युनिटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता दर मंगळवारी आणि शुक्रवारी दोन तास कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा लागणार आहे. आठवड्यात किती पोलिसांशी संवाद झाला याची नोंद ठेवण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली.
ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी पोलिसांच्या ड्यूटीदरम्यान होणाऱ्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था व डीजी लोन आदी प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले. पोलिसांच्या ड्यूटीचा ८ तासांचा कालावधी असला तरीही किमान १२ तास त्यांना काम करावे लागते. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलिस मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत. वसई, विरार, नवी मुंबई, पनवेलपासून कर्जत, कसारापर्यंत पोलिसांचे वास्तव्य आहे. यामुळे दिवसातील किमान १६ ते १८ तास त्यांचे ड्यूटी व प्रवासात जातात. त्यामुळे योगा आणि व्यायाम करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. पोलिसांचे सर्वाधिक मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होत आहेत.
गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, मुंबई व महाराष्ट्र पोलिस दलात गेल्या काही वर्षांत हृदयविकार, कर्करोग, आत्महत्या अशा विविध कारणांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले. यात कार्डियाक अरेस्टमुळे ७५ मृत्यू, कर्करोगामुळे ६ मृत्यू झाले आहेत. पोलिसांच्या कल्याणासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत असून यात ४० प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. यासाठी राज्यात २७० हॉस्पिटल्ससोबत टायअप केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, राज्य शासनाच्या १५० दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरतीसंदर्भातील सर्व प्रकरणे मिशन मोडवर निकाली काढली जातील. यासाठी सर्व विभागांना यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत.
विठ्ठल दर्शनासाठी खामगावहून ‘हरीभक्तांची’ रेल्वे पंढरपूरकडे रवाना
देवरी येथे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा सभा
देवरी,दि.4 जुलै – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील सभागृहात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा सभा संपन्न झाली.सदर आढावा सभेत जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे उपस्थित होते.आढावा सभेत देवरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सहायक,आरोग्य सहयिका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा गट प्रवर्तक, तालुका स्तरीय कर्मचारी उपस्थित होते.
आढावा सभेत जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी माता व बाल मृत्यु टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे त्यात किशोरावस्थापासुनच त्यांच्या विविध तपासणी सोबत गरोदर मातेचे बारा आठवड्याच्या आत नोंदणी,लोह,रक्तक्षय व कँल्शियम यांची मात्रा लाभार्थ्यांना देणे,वेळेत लसीकरण व फॉलोअप ठेव्ण्याच्या सुचना दिल्या.आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली(एच.एम.आय.एस.) ,एकात्मि
एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) हे साथीचे रोग तसेच इतर आरोग्यविषयक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करण्यासाठी महत्वाचे पोर्टल असुन सर्व आरोग्य संस्थानी एस,पी व एल.फॉर्म दैंनदीन भरण्याच्या सुचना दिल्या.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी पावसाळ्यात जलजन्य व किटकजन्य आजार जसे हिवताप व डेंग्युची रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांचे नियमित गृहभेटी सर्वेक्षण,डासांची पैदास रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतीचे उपाययोजना, गावात आरोग्य कर्मचार्यामार्फत करण्यात येणारे प्रतिबंधात्मक उपाययोजना, जैविक बाबी,प्रौढ डास व अळी कमी करण्याचे विविध पद्धती,मलेरियाच्या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी उपाययोजना,नवीन आणि उपचारांच्या पद्धती विषयी मार्गदर्शन करणे,डासअळी नाशक पद्धती अशा विविध बाबींचा आढावा याप्रसंगी घेवुन मार्गदर्शन केले.आढावा सभा यशस्वीतेसाठी देवरी तालुका आरोग्य सहाय्यक वरखेडे, संगणक परिचालक शहारे यांनी विशेष प्रयत्न केले.
तपासणीआड कृषी केंद्र व्यवसायीकांकडून वसुली
प्रभारी कृषी विकास अधिकाऱ्याची सीईओंकडे तक्रार
गोंदिया ः कृषी सेवा केंद्राच्या तपासणीआड प्रभारी कृषी विकास अधिकाऱ्याने कृषी व्यवसायीकांकडून वसुलीचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यवसायीकांनी याप्रकरणी जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे व त्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत कारवाईचे निर्देश दिले आहे.
जिल्ह्यात खरिपाच्या तोंडावर खताची साठेबाजी होत असून, शेतकऱ्यांवर वाढीव दराने खत खरेदीची वेळ आली आहे. याविषयी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी प्रमोद कागदीमेश्राम यांना काही कृषी सेवा केंद्राची तपासणी करा, अशी सूचना केली. परंतु, नव्या शासन आदेशानुसार कृषी विकास अधिकाऱ्यांचे तपासणीचे अधिकार काढल्याचे सांगत हे काम करण्यास कागदीमेश्राम यांनी नकार दिला. मात्र, त्यानंतर काही वेळातच ते आमगाव येथील जय भवानी कृषी सेवा केंद्र व त्यानंतर कट्टीपार येथील कृषी सेवा केंद्राची तपासणी करून पैशाची मागणी करीत असल्याचे व्यवसायीकांनी भ्रमणध्वनीवरून जिल्हा परिषद उपाध्यक्ष हर्षे यांना कळविले. त्यानंतर गोरेगाव तालुक्यातूनही कागदीमेश्राम यांनी पैशाची मागणी केल्याबाबत व्यवसायीकांनी माहिती दिली. यावेळी भ्रमणध्वनीवरून कागदीमेश्राम यांच्याशी उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी संवाद साधला असता त्यांनी चूक झाल्याची कबुली दिली. मात्र, हर्षे यांनी ही बाब गांभीर्याने घेत थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांना याबाबत माहिती देत कागदीमेश्राम यांच्यावर कारवाईची सूचना केली. आता त्यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहणे आैत्सुक्याचे आहे.
प्रभारी कृषी विकास अधिकारी कागदीमेश्राम हे तपासणीआड पैशाची मागणी करीत असल्याच्या अनेक तक्रारी कृषी व्यवसायीकांनी केल्या. त्यामुळे त्यांचा पदभार काढावा, अशी शिफारस सीईओंकडे केली आहे.
-सुरेश हर्षे,उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, गोंदिया
शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा-आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधानपरिषदेत मागणी
मुंबई:-शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत असा शासन आदेश असताना,शिक्षकांना सातत्याने या ना त्या कारणाने शैक्षणिक कामे लावली जातात.ही अशैक्षणिक कामे देऊ नयेत अशी मागणी कोकण विभागीय शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली.ते विधानपरिषदे मध्ये औचित्याच्या मुद्यावर बोलत होते.शिक्षकांना बी.एल.ओ, सारखी कामे देणे,युडायस, अपार,व विविध शिष्यवृत्त्या यांची ऑनलाइन कामे देणे हे बौद्धिक शैक्षणिक कामाला बाधा आणणारे ठरत आहे.तरी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देणे तात्काळ थांबवण्यात यावे असे मांडले.यावर सभापती राम शिंदे यांनी यावर सरकार निर्णय घेईल असे आश्वस्त केले.
भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे वृक्षारोपण
तिरोडा-सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया परिक्षेत्र तिरोडा अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे वनपाल एम आर एटरे, वनपाल पी एफ डहाट, उपसरपंच बाळकृष्ण सोनेवाने, प्राचार्य डी आर गिरीपुंजे ,ज्येष्ठ शिक्षक गोविंदप्रसाद बिसेन, डी एस बोदेले, वनमजूर इंद्रकुमार साठवणे, चंद्रशेखर पटले, राजू नंदेश्वर ,यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी शालेय पटांगणात विविध वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली विद्यार्थ्यांनी ‘ एक पेड मा के नाम ‘ यानुसार मनाशी गाठ बांधून वृक्ष संवर्धनाची कास धरली. त्या झाडाला दत्तक समजून संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली.
कार्यक्रमाचे संचालन डी एस बोदेले ,प्रास्ताविक प्राचार्य डी आर गिरीपुंजे ,आभार प्रदर्शन आर के किरसाण यांनी केले यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.