यावेळी वडेट्टीवरांनी दारूतस्करांची माहिती देणारा मुजिर शेख उर्फ भाईजी आणि ठाणेदार शिरासकर यांचे फोनवरील संभाषण, त्यांच्यामधील व्हाट्सअॅपवर झालेली चर्चा आणि खोट्या गुन्ह्यात गोवल्याप्रकरणी न्यायालयाने दिलेले निर्देशांचे दस्तावेज उघड केले. जिल्ह्यात शासनाने दारूबंदी केली मात्र, त्याच्या अंमलबजावणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामुळे गल्लोगल्ली दारूतस्कर निर्माण झाले आहेत. पोलीस विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाखोंचा हफ्ता मिळायला लागला आहे. जिल्ह्यात आज कोट्यवधीची बनावट दारू येत आहे. यामुळे लोकांचा जीव धोक्यात आला आहे, अशीही माहिती वडेट्टीवारांनी यावेळी दिली.
यावेळी वडेट्टीवारांनी राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात दारूचा व्यवसाय किती जोमाने सुरू आहे, याचीही माहिती दिली.बल्लारपूर पोलीस स्टेशनचा तत्कालीन ठाणेदार शिरसकर हा दारूतस्करांकडून हफ्ता वसूल करीत होता. महिन्याकाठी तो ५० लाख रुपयांची वसूली करत होता. तसेच दारूतस्करांची माहिती देणाऱ्यांवरच खोटे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही बाब न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर शिरसकरला कारणे दाखवा नोटिसही बजावण्यात आली होती. अर्थमंत्र्याच्या मतदार क्षेत्रात हा प्रकार सुरू असून अन्य ठिकाणी अवैध दारू व्यवसायाची काय स्थिती असेल? याची कल्पना येऊ शकते, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.