रायपूर(वृत्तसंस्था)दि.24ः – छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक डिझेल टँकर उडवल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.आज मंगळवारी (दि.24) कांकेर जिल्ह्यातील ताडोकी परिसरात नक्षलवाद्यांनी डिझेल टँकर उडवल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांकेर जिल्ह्यातील ताडोकी परिसरातील कोसरोंडा आणि तुमापाल गावादरम्यान ही घटना घडली. काही दिवसांपासून परिसरात रेल्वे रुळाचे काम सुरू आहे. कामाच्या ठिकाणी हे डिझेल टँकर नेले जात होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक डिझेल टँकर उडवला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचीही माहिती मिळत आहे.




