37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय राष्ट्रवादीचे आमदार फुटल्यामुळे हा सर्व पेच निर्माण झाला – अहमद पटेल

राष्ट्रवादीचे आमदार फुटल्यामुळे हा सर्व पेच निर्माण झाला – अहमद पटेल

0
41

blank

मुंबई,दि.23- महाराष्ट्राच्या इतिहासात आजची घटना काळ्या शाईने लिहीली जाईल, असे मत काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेलांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसने आपली स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली त्यात ते बोलत होते. यावेळी अहमद पटेल यांच्यासोबत सी वेणुगोपाल, मलिकार्जून खर्गे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, “आमच्यावर राज्यपालांनी अन्याय केला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आम्हाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण द्यायला हवे होते, पण तसे झाले नाही.”

“संविधानावर चालणाऱ्या काही लोकांनीच संविधानाचा अपमान केला. शपथविधीसाठी निषेध करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आमची एक प्रक्रिया सुरू होती आणि काल सर्वकाही ठरलं होतं. दिल्लीत शरद पवारांसोबत बैठका झाल्या. त्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा होणं गरजेचं होतं, त्यानुसार काल आम्ही बैठक घेतली आणि आजसत्ता स्थापनेवर मोठं पाऊल उचलणार होतोत. पण, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे हा सर्व पेच निर्माण झाला.”

राष्ट्रवादीमधील काही नेते बाहेर गेले असले तरी, पक्ष आमच्या बाजूने आहे. सभागृहात भाजपला बहुमत चाचणी द्यावी लागेल, त्यात त्यांना बहुमत मिळणार नाही. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना मिळून सत्ता स्थापनेचा दावा करेल. आमदार फोड-फोडी होईल का असा प्रश्न विचारल्यावर पटेल म्हणाले की, आमचा कोणताही आमदार फुटणार नाही. पक्षाचे सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत. भाजप बहुमत चाचणीत अपयशी झाल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना बहुमत चाचणी जिंकेल. असे पटेल यावेळी म्हणाले.

blank