सडक अर्जुनी,दि.25– वनविभागाच्या जागेवर अवैध रस्ता ग्राम पंचायतीने तयार केल्याने वनप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. हा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यांतर्गत डुग्गीपार-नैनापुर येथे समोर आला आहे. दरम्यान हा रस्ता बंद करुन शेतकऱ्यांसाठी आरक्षित करण्याची मागणी शेतकरी, वन्यप्रेमींसह नागरिकांनी केली आहे.काही दिवसांपूर्वी अवैध मरुमाचे उत्खनन करण्यात आले. तसेच ९ ते १० एकरवर वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. त्याला प्रशासनाकडून हटविण्यात आले. या तलावाकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना आरक्षित रस्ता सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या अटींच्या आधारावर वनविभागाने तलाव क्र. १ कडे जाण्यासाठी ०.१५ हेक्टर जमीनची मंजुरी दिली.या वन जमिनीचे ग्रामपंचायतकडून मनरेगांतर्गत रस्ता तयार करण्यात आला. आता या रस्त्याचा अवैधरित्या उपयोग होत आहे. आधी या रस्त्याच्या जवळ रानडुकराची शिकारही झाली होती. तसेच येथे असलेल्या वन संपदेला नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठी या रस्त्याचा उपयोग अवैधरित्या होत असल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात यावे, अशी मागणी गावकरी करत आहेत.




