रेमडेसिव्हिर काळाबाजार प्रकरणातील सहा आरोपी निर्दोष

0
82

जिल्हा सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्वाळा
गोंदिया, ता. 27 ः रेमडेसिव्हिर काळाबाजार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व गोंदिया शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केलेल्या सहा आरोपींची गुरुवारी (ता. २६) जिल्हा व सत्र न्यायालय गोंदियाचे मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जे. भट्टाचार्य यांनी निर्दोष मुक्तता केली.
स्थानिक गुन्हे शाखा व गोंदिया शहर पोलिसांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन व मिथाईल प्रेडनिसोलोन सोडियम इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात आरोपी अमोल चाैधरी याला पकडले होते. त्याची चाैकशी केली असता, त्याने संजय तुरकर व गाविका चाैधरी यांची नावे सांगितली. त्यामुळे तिघांनाही ४ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर या तिन्ही आरोपींना ५ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, २ आॅगस्ट रोजी पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. त्याच दिवशी मुख्य न्यायदंडाधिकारी, गोंदिया यांनी आरोपींवर दोषारोप लावले. आरोपींनी दोषारोप फेटाळल्याने ४ आॅगस्ट रोजी साक्षपुराव्याकरिता सदर खटला न्यायालयात ठेवण्यात आला. याच दिवशी सरकारच्या बाजूने आरोपीविरुद्ध सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारचे सगळे साक्षीदार तपासून व उभय पक्षांची बाजू एेकूण गुरुवारी (ता. २६) मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जे. भट्टाचार्य यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपी अमोल चाैधरी व संजय तुरकर यांची बाजू अॅड. प्रवीण श्यामकुवर व अॅड. देवेंद्र उर्फ चंदू पारधी यांनी मांडली. तसेच आरोपी गाविका चाैधरी यांची बाजू अॅड. अरुण उपवंशी यांनी मांडली.
याशिवाय दुसऱ्या प्रकरणात २० एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखा व गोंदिया शहर पोलिसांनी सापळा रचून आरोपी संजूकुमार बागडे याला रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करताना पकडले होते. त्यानंतर त्याची चाैकशी केली असता त्याने दर्पण वानखेडे व नीतेश चिंचखेडे यांची नावे सांगितली. त्यामुळे पोलिसांनी त्यांनाही अटक केली होती. तिन्ही आरोपींना २१ एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, २ आॅगस्ट रोजी पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. त्याच दिवशी मुख्य न्यायदंडाधिकारी, गोंदिया यांनी आरोपींवर दोषारोप लावले. आरोपींनी दोषारोप फेटाळल्याने ४ आॅगस्ट रोजी साक्षपुराव्याकरिता सदर खटला न्यायालयात ठेवण्यात आला. याच दिवशी सरकारच्या बाजूने आरोपींविरुद्ध तीन साक्षीदार तपासण्यात आले. सरकारचे सगळे साक्षीदार तपासून व उभय पक्षांची बाजू एेकूण गुरुवारी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. जे. भट्टाचार्य यांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपी संजूकुमार बागडे व नीतेश चिंचखेडे यांची बाजू अॅड. प्रकाश तोलानी व आरोपी दर्पण वानखेडे यांची बाजू अॅड. मोहन गुप्ता यांनी मांडली. उल्लेखनीय म्हणजे, जिल्हा व सत्र न्यायालयात प्रथमच रेमडेसिव्हिर प्रकरणाचा २४ दिवसांच्या आत न्यायनिवाडा करण्यात आला आहे.