जामठ्याजवळील कार अपघातात माय-लेकाचा मृत्यू

0
9

नागपूर,दि.22 – नागपूरवरून वर्ध्याकडे भरधाव जात असलेल्या कारला ट्रकने दिलेल्या धडकेत कार रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. मागून आलेल्या खासगी बसने कारला चिरडले. यात कारमधील मायलेकांचा मृत्यू झाला तर तिघे या अपघातात जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.२१) सायंकाळी सहाच्या सुमारास जामठ्याजवळ घडली.मृतांमध्ये वर्धा निवासी आशा जोशी(६२) व अभिजित जोशी(४४) या मायलेकाचा समावेश आहे. जखमींमध्ये सृष्टी जोशी (३२), मिलिंद जोशी(३८), गार्गी जोशी (७, सर्व रा.वर्धा) यांचा समावेश आहे. वर्धा येथील जोशी कुटुंब कारने (एमएच३१इए-९८३४) नागपूरवरून वर्धा येथे जात होते. मागून भरधाव आलेल्या एका वाहनाने जामठा गावाजवळ कारला धडक दिली. यामुळे कार दुभाजक पार करून विरुद्ध दिशेने भरधाव  जात असलेल्या खासगी बसने कारला जबरदस्त धडक झाली. या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांचा ताफा दाखल झाला.जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुगावकर करीत आहेत.