चंद्रपूर,दि.05ः- स्वच्छ भारत मिशनच्या कामाचे बिल काढण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच मागणार्या सरपंचाला चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. प्रदीप शंकर महाकुलकर (४८) रा. पानवडाळा ता. भद्रावती असे लाचखोर सरपंचाचे नाव आहे.
तक्रारकर्त्याने स्वच्छ भारत मिशनचा फलक तयार केला होता. त्या मोबदल्यातील आठ हजार रुपयांचे बिल ग्रामपंचायतीकडे अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. सदर बिल काढण्याची मागणी तक्रारकर्त्याने सरपंचाकडे केली. मात्र, सरपंचाने बिल काढण्यासाठी दीड हजारांची लाच मागितली. लाच द्यायची नसल्यामुळे तक्रारकर्त्याने थेट चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. याआधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सरपंचाला दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
सदर कारवाई नागपूरच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार, पोलिस उपअधीक्षक भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नीलेश सुरडकर, पोलिस नायक संतोष येलपुलवार, पोशि संदेश वाघमारे, नरेश नन्नावरे, रोशन चांदेकर, राहुल ठाकरे आदींनी केली





