सनसंपदा, संसाधनावर विद्यार्थ्यांना शिक्षण दिले तर राज्यातील एकमेव विद्यापीठ बनू शकेल

0
9

माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर : गोंडवाना विद्यापीठाचा वर्धापन दिन

गडचिरोली-गोंडवाना विद्यापीठ परिसरात वनसंपदा आणि संसाधनांचा खजिना आहे. या साधनसंपत्तीचा वापर करून विद्यार्थ्यांना या खजिन्यावर आधारित शिक्षण दिले तर हे विद्यापीठ राज्यातील एकमेव विद्यापीठ बनू शकेल, असे प्रतिपादन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.शरद निंबाळकर यांनी यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या २ ऑक्टोबर रोजी ११ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली-चिमूरचे लोकसभेचे खासदार अशोक नेते, गडचिरोलीचे विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन उपस्थित होते. मानवी जीवनातील शिक्षणाचे मूल्य सांगून डॉ. निंबाळकर पुढे म्हणाले की, शिक्षण हा माणसाचा अलंकार आहे. माणसाला त्याच्या शिक्षणामुळे मान मिळतो. शिक्षण नसलेला माणूस हा सर्वात मागासलेला मानला जातो. माणूस संपत्तीने नव्हे तर शिक्षणाने ओळखला जातो. शिक्षण ही एक संपत्ती आहे. शिक्षणाशिवाय माणूस हा जनावरासारखा आहे. शिक्षण माणसाला यशस्वी बनवते, त्याचे जीवन सुंदर बनवते. ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी माणसाला स्वत:च्या गुरुचाही स्वामी बनवते. असे शिक्षण आणि ज्ञानाचे गुण आहेत त्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाला इतके महत्त्व दिले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्‍चित करावे. मोठे शास्त्रज्ञ हे त्यांचे आदर्श असावेत. त्यांनी स्वत:ला इतरांपेक्षा कमी समजू नये. माणसाची ओळख त्याच्या जातीने किंवा धर्माने नव्हे तर त्याच्या शिक्षणाने झाली पाहिजे, असे डॉ.निंबाळकर म्हणाले.
कार्यक्रमात प्रख्यात समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांना त्यांच्या समाजातील अतुलनीय सेवेबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यापीठाच्या ‘जीवन साधना गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्कार प्रसंगी मोहन हिराबाई हिरालाल म्हणाले की, महात्मा गांधींनी सांगितलेली अहिंसा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली समता ही दडपल्या गेलेल्या समाजाला पुढे नेण्यासाठी सहसंबंधित साधने आहेत. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत असे म्हणणे चुकीचे आहे. या दोन्ही नेत्यांना मानवतेच्या आधारे समाजात बदल हवा होता. हे विचार पुढे नेण्याची गरज आहे. कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याला बाहेरचे लोक मागास म्हणतात पण खरं पाहता हा सगळ्यात प्रगत असा भाग आहे, आणि इथे समृद्ध असं जंगल आहे. एखाद बी पेरल्यानंतर त्याची फळे आणि फुले फळाला येतात तसेच विद्यापीठाचे फळे आता आपल्याला दिसायला लागतील. प्राध्यापकांनी अगदी तळागाळातल्या भागात संपर्क अभियान राबवले. त्याचंच फलित म्हणजे मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थ्यांनी मोफत प्रवेश घेतला आहे. काही महिन्यातच विद्यापीठात अनेक सकारात्मक बदल होऊन राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा नावलौकीक होईल. डॉ. शिल्पा आठवले यांनी मोहन हिराबाई हिरालाल यांच्या मानपत्राचे वाचन केले डॉ.श्रीराम कावळे यांनी प्रास्ताविक, डॉ.नरेंद्र आरेकर यांनी संचालन तर आभार डॉ.अनिल हिरेखान यांनी मानले.