महाराष्ट्राला पुढच्या दोन वर्षासाठी ‘नीट’ परिक्षेमधून सवलत मिळावी-मुख्यमंत्री

0
9

नवी दिल्ली : महाराष्ट्राला पुढच्या दोन वर्षासाठी ‘नीट’ परिक्षेमधून सवलत मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत केली.

सर्वोच्च न्यायालयाने ‘राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षे’बाबत (नीट) दिलेल्या निकालामुळे विद्यार्थ्यांना याच वर्षापासून नीट परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. मात्र यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी राज्याला पुढील दोन वर्षासाठी ‘नीट’ परिक्षेमधून सवलत मिळावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत सविस्तर माहिती दिली. यावर पंतप्रधान श्री.मोदी यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

सामाईक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) अभ्यासक्रम राज्याच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्यामुळे महाराष्ट्रातील 80 टक्के विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे सोयीचे आहे. ‘नीट’ परिक्षेचा अभ्यासक्रम हा केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सी.बी.एस.ई.) च्या अभ्यासक्रमाच्या आधारित असल्यामुळे राज्यातील शहरी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना पुढील दोन महिण्यात होणाऱ्या ‘नीट’ परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी अपुरा वेळ आहे. इतक्या कमी कालावधीत ‘नीट’ चा अभ्यासक्रम समजणे विद्यार्थ्यांना कठीण होईल. महाराष्ट्रात सीईटी कायदा पारित करून खाजगी आणि सरकारी परीक्षा एकत्रच करून घेण्यात आल्या आहेत, त्यामुळे अवैध प्रवेशांना आळा बसलेला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवाय राज्य शासनालाही तयारीसाठी दोन वर्षांचा किमान कालावधी मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान श्री. मोदी यांना बैठकीत केली.