शेती व पशुधन विकासासाठी आधुनिक विज्ञानाचा उपयोग व्हावा – मुख्यमंत्री

0
13

नागपूर, दि. 9 : सत्य बोलणे हे आपले कर्तव्य असून माता-पिता व गुरुजनांचा नेहमी आदर करा, असा संदेश राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी नागपूर येथे दिला. तर आधुनिक विज्ञानाच्या जोडीने पशुधनाचा विकास गरजेचा असून समाजासाठी कार्य करणे हीच खरी पदवी असल्याचेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या 8 व्या पदवीदान समारंभ आज झाला. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या समारंभात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
या समारंभात कुलपती या नात्याने राज्यपालांनी पदवी प्राप्त करणाऱ्या स्नातकांना पारंपरिक उपदेश केला. नेहमी खरे बोला, आपले कर्तव्य पार पाडा,जे शिक्षण प्राप्त केले आहे त्यापासून दूर जावू नका, आई-वडील-
शिक्षक-अतिथी आणि देश यांना देव माना, असे कुलपती आपल्या पारंपरिक उपदेशात म्हणाले. विद्यार्थ्यांनी या उपदेशाचा आदर करुन पालन करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख पाहुणे म्हणून तर विद्यापीठाचे प्रति कुलपती तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती होती.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, सरसंघचालाक डॉ. मोहन भागवत, कुलगुरु ए. के. मिश्रा व कुलसचिव डॉ. अ. स. बन्नाळीकर हे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जीवनातील विचारांची दिशा ठरविण्याचे काम विद्यापीठे करीत असतात. मोहनजी भागवत यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान केल्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले. भागवत यांना सन्माननीय पदवी प्रदान केल्यामुळे त्यांच्या नव्हे तर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेत भर पडली आहे.व्यक्ती, समाज आणि देश घडविणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेचे ते प्रमुख आहेत. जीवनाच्या सर्व क्षेत्रात देशभक्तीचा संस्कार असलेल्या व्यक्ती कार्यरत असाव्यात यासाठी ते सर्वांनाच प्रेरणा देत असतात. त्यांचे व्यक्तिमत्व या विद्यापीठात घडले, असे त्यांनीच सांगितलेले आहे. त्यावरुन विद्यापीठाकडून घडणारे कार्य किती मोलाचे असते हे आपल्या लक्षात येईल.
यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते पदवी व पदक प्रदान करण्यात आले. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कु. अश्विनी रमेश चापले या विद्यार्थिनीने शैक्षणिक वर्ष 2014-15 साठी सहा सुवर्ण पदके व
चार रौप्य पदके प्राप्त केली आहेत. तर 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शिवांगी देवदास पै या विद्यार्थिनीने आठ सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त केले आहे. नागपूर पशुवैद्यकीय
महाविद्यालयाच्या रोहीत सिंग या विद्यार्थ्याने तीन सुवर्ण व चार रौप्य पदके मिळविली आहेत. या विद्यार्थ्यांचा राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी गौरव केला.2014-15 तसेच 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र पशु
व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे एकूण 58 पदके वितरित करण्यात आली. यात 42 सुवर्ण व 16 रौप्य पदकांचा समावेश आहे.
यावेळी दीक्षांत भाषणात डॉ. त्रिलोचन मोहापात्रा म्हणाले की, माफसू विद्यापीठाला अधिस्वीकृत दर्जा प्रदान करण्यात आला असून देशातील 73 विद्यापीठापैकी माफसू हे गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षण देणारे असल्याचे
त्यांनी सांगितले.शेती आणि पशुसंवर्धन या बाबतीतील देशभरातील आजची स्थिती आणि आव्हाने यांचा त्यांनी परामर्श घेतला. शेतीतील उत्पादन दुप्पटीने वाढविण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाची पूर्तता
करण्याची जबाबदारी आपली आहे. असे ते विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले.या विद्यापीठाला यंदा 3 कोटी तर पुढील वर्षी 5 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरु ए. के. मिश्रा यांनी केले.विद्यापीठातील सर्व शाखांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु केली असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयात 21 संशोधन प्रकल्प सध्या सुरु असून विद्यापीठाच्या स्थापनेपासून 64.75 किंमतीचे 130 संशोधन प्रकल्प पूर्ण केले गेले आहेत. यापैकी काही प्रकल्पांचे निष्कर्ष हे खूपच उत्तम असून त्यावर आधारित उद्योग व शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या शिफारशी विद्यापीठाने वेळोवेळी प्रसारित केल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध पदव्या व पदके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शिरिष उपाध्ये व डॉ. सुनीत वानखेडे यांनी केले. या पदवीदान समारंभात राज्यातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.