नऊ शिक्षकांच्या दुर्गम भागात बदल्या

0
11

गडचिरोली,दि.29 : ऑनलाइन बदली प्रक्रियेत खोटी माहिती दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने गडचिरोली जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षा म्हणून नऊ शिक्षकांच्या बदल्या दुर्गम भागात केल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शासनाच्या नवीन बदली धोरणानुसार यंदा शैक्षणिक सत्राच्या पूर्वी थेट पुण्यावरून गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास आठशेवर शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने गेली अनेक वर्षे दुर्गम भागात सेवा केलेल्या शिक्षकांच्या चांगल्या भागात बदल्या
करण्यात आल्या. यामध्ये पती-पत्नी एकत्रीकरण, आपसी बदली तसेच जिल्हाबाह्य बदल्यांचा समावेश होता. ऑनलाइन बदली प्रक्रियेत बदलीच्या ठिकाणाचे पर्याय देण्यात आले. त्यानुसार शिक्षकांनी फॉर्म भरले होते. मात्र, यासाठी कुठल्याही प्रकारचे पुरावे जोडण्यात आले नाही. याच संधीचा फायदा घेत गडचिरोली जिल्ह्यातील काही शिक्षकांनी बदलीस पात्र होण्यासाठी खोटी माहिती भरली. बदलीप्रक्रिया पार पडल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या पसंतीची गावे देण्यात आली. अवजड आणि सोपा असे दोन प्रकारचे निकष होते. त्यामुळे यंदा अवजड भागातून मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या बदल्या सोप्या भागात करण्यात आल्या. मात्र, रुजू झाल्यानंतर आरमोरी, देसाईगंज व गडचिरोली तालुक्‍यात सोयीचे ठिकाण मिळालेल्या शिक्षकांबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत नऊ शिक्षक दोषी आढळून आले. त्यामुळे शिक्षा म्हणून त्यांच्या बदल्या तत्काळ अतिदुर्गम भागात करण्यात आल्या. यात काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.