अटलबिहारी वाजपेयींना ‘भारतरत्न’ प्रदान

0
11

नवी दिल्ली – देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असणारा भारतरत्न हा पुरस्कार भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वाजपेयींना शुक्रवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शासकीय शिष्टाचार बाजूला ठेवून वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान केला आहे. दिल्लीतील कृष्ण मेनन मार्ग येथील वाजपेयींच्या निवासस्थानी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी , पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदी मान्यवरही उपस्थित होते.
अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न देण्याची घोषणा गेल्या वर्षी २४ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवशी करण्यात आली होती. तेव्हा ते फक्त थोडेसे हसले होते. परंतू दोन दिवसांपूर्वी जेव्हा राष्ट्रपती स्वतः घरी येऊन त्यांचा हा सन्मान करणार आहेत, असे सांगितले तेव्हा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अटलजी गेल्या काही वर्षांपासून आजारी आहेत. त्यांना अल्झायमर डिमेंशिया झाला आहे.
वाजपेयी यांनी त्यांचे संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित केले, या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालो हे माझे भाग्यच आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. राष्ट्रपतींनी वाजपेयी यांच्या निवासस्थानी येऊन हा पुरस्कार दिला यासाठी मी त्यांचे आभारी आहे असे मोदींनी सांगितले.

अजातशत्रू वाजपेयींची कारकिर्द
५ डिसेंबर १९२४ साली ग्वाल्हेर येथे जन्मलेले वाजपेयी हे भारतीय जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी तीन वेळा पंतप्रधानपद भूषवले आहे. अणू चाचणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेत त्याची अमलबजावणी करण्याचे कामही त्यांनी केले. तसेच दिल्ली-लाहोर दरम्यान बससेवा सुरू करून भारत- पाकिस्तानचे संबंध सुधारण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. उत्कृष्ट वक्ता आणि कवि मनाचा नेता अशी ओळख असलेल्या वाजपेयी यांनी त्यांच्या वक्तृत्त्व कौशल्याने अनेकांची मने जिंकली. काँग्रेस व अन्य विरोधी पक्षातील नेत्यांशीही वाजपेयी यांचे चांगले संबंध होते.संसदेत वाजपेयी यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांवर विरोधकांनीही दाद दिली आहे. संघाच्या तालमीत घडलेले वाजपेयी हे धर्मनिरपेक्ष नेते म्हणून प्रसिद्ध आहेत हेेदेखील एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.