मुंबई दि.२१:- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणात ‘सनातन’चा पूर्णवेळ साधक समीर गायकवाड याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या फोन संभाषणातून महत्त्वाचे पुरावे मिळाले असून, दाभोळकर-पानसरे यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रात आता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे हिंदूत्ववाद्यांच्या निशाण्यावर होते, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
महाराष्ट्र ‘अनिसं’चे संस्थापक नरेंद्र दाभोळकर आणि डाव्या विचारसणीचे ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर वागळेंनी आपल्या टीव्ही शोमधून हिंदूत्ववाद्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे आता यापुढे महाराष्ट्रातील तिसरे आणि देशातील चौथे टार्गेट म्हणून वागळे यांचे नाव मारेकऱ्यांच्या लिस्टमध्ये होते, याचे महत्त्वाचे पुरावे गायकवाड याच्या फोन संभाषणातून पोलिसांच्या हाती लागले आहेत.
गायकवाडच्या पोलिस कोठडीचे चार दिवस संपले असून, तीन दिवसांत पोलिसांना माहिती काढायची आहे. गोव्यात झालेल्या स्फोटात ‘सनातन’चे दोघे ठार झाले होते. रूद्र पाटील तेव्हापासून फरार आहे. जत तालुक्यातील रूद्र एनआयएच्या वाँटेडच्या यादीत आहे. समीरच्या अटकेची माहिती मिळाल्याने एनआयएचे पथक आले होते. समीरला ठेवलेल्या पोलिस मुख्यालयात येण्याऐवजी बाहेरच जिल्हा पोलिस प्रमुखांकडून पथकाने माहिती घेतली.