राज्य शासन डिजीटल क्षमतेची स्मार्ट शहरे विकसित करणार- मुख्यमंत्री

0
5

राज्यातील तीन शहरांच्या विकासासाठी सहकार्य करणार

मुंबई दि.०४: राज्यातील शहरे स्मार्ट व डिजीटल क्षमतेची करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्याअंतर्गत दहा शहरे स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.राज्यातील शहरे डिजीटल स्मार्ट सिटी करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग व हेवलेट पॅकर्ड इंटरप्रायझेस (Hewlett Packard Enterprise) ही जागतिक कंपनी यांच्यात गुरूवारी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवनात सामजंस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य शासनाच्या वतीने माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम व हेवलेट पॅकर्ड इंटरप्रायझेसच्या वतीने उपाध्यक्ष सोम सत्संगी यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

हेवलेट पॅकर्ड ही जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. या कराराअंतर्गत राज्यातील अमरावती, औरंगाबाद व नाशिक ही शहरे स्मार्ट शहरे करण्यासाठी ही कंपनी तांत्रिक सहाय्य व भांडवल पुरविणार आहे. या तीनही शहरांच्या स्मार्ट सिटी व डिजीटल सिटीसंदर्भातील निविदेचे काम येत्या सहा महिन्यात सुरू होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात हेवलेट पॅकर्ड इंटरप्रायझेस ही कंपनी सहभागी होत असल्याचा आनंद आहे. पारदर्शक सेवा देण्यासाठी व शहरांच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या दोन आणि राज्य शासनाने स्वतः आठ अशी दहा शहरे स्मार्ट करणार आहे. या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. या कराराची लवकरच अंमलबजावणी सुरू होईल.श्री. गौतम यांनी यावेळी कराराची माहिती दिली. राज्य शासनाने राज्यातील आठ हजार गावे डिजीटल व्हिलेज करण्याचे ठरविले असून त्याची सुरुवात झाली आहे. भारत नेट प्रकल्पाअंतर्गत ऑप्टिकल फायबर नेटवर्कने ही गावे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये ई-मेडिसीन, ई-एज्युकेशनची सुविधा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.