ऍट्रॉसिटी कायद्यात बदल शक्‍य – रामदास आठवले

0
5
वृत्तसंस्था मुंबई दि. 23 – राज्यभरात मराठा मोर्चे लाखोंच्या संख्येने निघत असताना ऍट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही. मात्र, त्यात आवश्‍यक ते बदल करण्यात येऊ शकतात. त्याबाबत विचार केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. आज सह्याद्री अतिथीगृह येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यभरातला मराठा समाज मूक मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला आहे. पहिल्यांदाच मराठा समाजाचे एवढ्या मोठ्या संख्येचे मोर्चे असले तरी या मोर्चामुळे दलित समाजात कोणतीही अस्वस्थता नाही. इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे आठवले यांनी सांगितले.

दलित आणि मराठा या दोन्ही समाजाला एकमेकांची गरज आहे, असं सांगत या दोन्ही समाजात ऐक्‍य निर्माण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सात ऑक्‍टोबरला शिर्डीत दलित मराठा ऐक्‍य परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक राज्यात विविध समाजाकडून आरक्षणाची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या सर्व समाजाला क्रिमिलिअरमध्ये आरक्षण देता येईल यासाठी घटनादुरुस्ती आवश्‍यक असून, त्यादृष्टीने केंद्रात प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. मराठा समाजाने आरक्षणाबाबत पूर्वीच्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा असं आठवले यांनी या पत्रकारपरिषदेत सांगितले.