
अकोला : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नेमका उपाय सापडत नसून, १०० टक्के आत्महत्या थांबतील यासाठी सध्यातरी कोणता मार्ग दिसत नाही, अशी अगतिकता कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी अकोला येथे व्यक्त केली. शेतकऱ्यांचे नैराश्य घालविण्यासाठी शेतीपूरक जोडधंद्याशिवाय तरणोपाय नाही, असेही ते म्हणाले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी कृषिमंत्री खडसे बोलत होते. दुष्काळामुळे नापिकी आल्याने राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्येचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे.
शेतकऱ्यांना ४० शेळ्या व २ बोकड देणार असून अनुसूचित जाती, जमातींच्या शेतकऱ्यांना निशुल्क गायींचे वाटप केले जाईल. सूक्ष्म, संरक्षित सिंचनास शेततळ्यांची योजना नव्याने राबविण्यात येईल. याकरिता २० लाखांचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. शेततळ्यातून पाणी घेण्यासाठी सौरऊर्जेवरील पंपदेखील देण्यात येतील. यासाठी ४.१० लाखांचे अनुदान दिले जाईल. सूक्ष्म सिंचन योजनेचे साहित्य घेण्यासाठी अनुदान वाढवून दिले जाणार असून, आठ दिवसांत हे अनुदान त्यांना मिळेल. जिथे शेत तिथे रस्ता तयार करण्याचे आदेश दिले आहेत. माती परीक्षणाचा अहवाल कृषी कार्ड शेतकऱ्यांना घरपोच दिले जाणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हे शेती क्षेत्रापुढे मोठे आव्हान असून, शेतकऱ्यांतील नैराश्य घालविण्यासाठी व्यापकतेने काम करावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक जोडधंदा, प्रक्रिया उद्योग, दुग्धोपादनासारखे व्यवसाय अधिक वृद्धिंगत करण्यावर शासनाचा भर आहे.