कोणालाही घाबरायला मी काही ब्राह्मण नाही- दिलीप कांबळे

0
11

लातूर, दि. 13 – माझ्यामागे आंदोलने केली जात आहेत, कोणालाही घाबरायला मी काही ब्राह्मण नाही, मी मागासवर्गीय आहे, असे वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.ते म्हणाले, सामाजिक न्याय विभागातील दलालांची दलाली बंद केल्याने आता काही जण माझ्या मागे आंदोलन करीत आहेत. माझ्यासमोर कोणी घोषणाबाजी केली असती, तर त्यांच्या मुस्कटात लगावली असती. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांना धमकीवजा इशाराच दिला आहे. कांबळे यांनी असे वक्तव्य केल्याने उपस्थितांत उलटसुलट चर्चा होती.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नांदेडमध्ये शनिवारी (ता. 11) पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमानंतर मंत्री आणि शासनाच्या विरोधात आंदोलन केले होतं. याचा हवाला देत कांबळे यांनी आंदोलकांवर निशाणा साधला आहे. विकासकामात राजकारण करायचे नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. भाजपा सरकार हे गोरगरिबांचे आहे. सामाजिक न्याय विभागातील दलालांची दलाली बंद केली आहे. त्यामुळेच माझ्या बदनामीसाठी काही जण मुद्दामहून आंदोलन करत आहेत. यासंदर्भात व्हॉट्सऍपवर एक क्‍लिप व्हायरल करण्यात आली आहे. माझ्यासमक्ष हे आंदोलन झाले असते तर चांगलीच मुस्कटात लगावली असती. मी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत वाढलेला कार्यकर्ता आहे. मी घाबरणारा नाही, असे दिलीप कांबळे म्हणाले आहेत.