सुरेश काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार घोषीत

0
9

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते होणार सन्मान

नांदेड, दि.21 – पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेसाठी विविध उपक्रम राबवित जलयुक्त शिवार अभियानातून राज्यासाठी तीन महत्त्वपुर्ण पॅटर्न मांडले, वंचितांसाठी अन्न सुरक्षा व उज्ज्व नांदेड अशा अभिनव संकल्पनांना मुर्त रूप देण्यासाठी सातत्यपुर्ण प्रयत्न करणारे नांदेड जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव प्राप्त झाला आहे. आज दि. २१ एप्रिल रोजी नागरी सेवा दिनानिमित्त व राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत होत असलेल्या कार्यक्रमात मुंबई येथे राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

नांदेड येथे २० एप्रिल रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नांदेडचे पालकमंत्री ना. अर्जून खोतकर यांनी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले आहे. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी नांदेड जिल्ह्यात रूजू झाल्यापासूनच लोकाभिमुख तसेच अनेक नाविन्यपुर्ण संकल्पना राबविण्यात सातत्य ठेवले आहे. या सर्व कामांचा या पुरस्कारासाठी निवड करताना विचार करण्यात आला आहे. विशेषतः मे २०१५ मधील दुष्काळाच्या झळा तसेच टंचाईचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी विविधस्तरावर प्रयत्न केले. विविध यंत्रणांचा समन्वयही साधला. यामुळे पाणी टंचाईवर यशस्वीपणे मात करता आली. त्यासाठी इसापूर धरणातून थेट बाभळी बंधाऱ्यापर्यंत कमीतकमी खर्चात, आणि पाण्याचा कमीत कमी अपव्यय होऊन पिण्याचे पाणी उपलब्ध केले. नांदेड शहरासाठीही येलदरी धरणातून विष्णुपुरीपर्यंत पाणी आणले होते.

नांदेड जिल्ह्याने जलयुक्त शिवार अभियानातून राज्यासाठी नाविन्यपुर्ण असे पॅटर्न देण्याचा मान यांच्यात प्रयत्नातून पटकाविला आहे. यातूनच उगम ते संगम नाला पुनरुज्जीवन, जलपुनर्भरण स्तंभ (रिजार्च शॅाफ्ट), विहीर पुनर्भरण अशा संकल्पना विकसित झाल्या. यामुळे नांदेडमधील जलयुक्त शिवार अभियानातील कामही वैशिष्ट्यपुर्ण ठरले. त्यामुळेच जिल्ह्यात यंदा उन्हाळ्यातील टँकर्सची संख्याही घटलीआहे.जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी स्वच्छ भारत मिशनमध्येही जिल्ह्यातील चौदाही नगरपालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान प्रभावीरित्या राबविले. यामुळे या नागरीक्षेत्रातील स्वच्छतेसाठीही जिल्ह्याला राज्यस्तरावर सन्मानित करण्यात आले आहे. टंचाईच्या परिस्थितीतही जिल्ह्याची महसुली वसुली १०५ टक्क्यांवर नेण्यातही जिल्हाधिकारी काकाणी यांनी यश मिळविले आहे. प्रलंबित महसुली प्रकरणे निकाल काढण्यातही आघाडी ठेवली आहे. माहूर विकास प्राधिकरण आराखड्यासाठी २१६ कोटी रुपयांचा भरीव निधी मिळविण्यासाठीही प्रयत्न केले. विष्णुपूरी उपसा जलसिंचनास चालना देण्यामुळे लोहा-कंधार भागातील कालवे पुनरूज्जीवत झाले, त्यातून खरीपासह, रब्बी आणि उन्हाळी पिके घेण्याचे नियोजन, त्या परिसरातील शेतकऱ्यांना करता आले आहे. जिल्ह्यातील पीक पद्धतीत सकारात्मक बदल व्हावा, शेतकऱ्यांनी कृषी पूरक उद्योगांसाठीही प्रयत्न केले.यासाठी विविध यंत्रणांना एकात्मिक पद्धतीने काम करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे.भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने सुरु करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाला उज्ज्वल नांदेड म्हणून आगळ्या पद्धतीने पुढे नेले.ज्याद्वारे नांदेड जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांतील विविध विषयांचे थेट विषयाशी निगडीत मार्गदर्शन मिळणे सुरु झाले आहे. यातून जिल्ह्यातील सुमारे शंभरहून अधिक उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षांचे यश मिळाले आहे.

जिल्ह्यासाठीच्या विकास आराखड्यातील निधींचे काटेकोर नियोजन, तसेच पुरेपूर विनीयोग करत प्रशासनातील मानवी आस्थाही विविध उपक्रमानी वृद्धींगत केली आहे. यामध्ये वंचितासाठी अन्न सुरक्षा या उपक्रमास थेट राष्ट्रपती भवनातील सादरीकरणासाठी निमंत्रित कऱण्यात आले आणि त्याच्याविषयी कौतुकोद्गारही काढण्यात आले. प्रशासकीय रेट्यातही त्यांनी प्रचंड थंडीच्या दिवसात निराधारांना शालींचे वाटप, निराधार मुलींसाठी दंगल चित्रपट दाखविण्याचा उपक्रम राबविला.यासह विविध बाबींचा सर्वंकष विचार करून जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.