मुंबई,दि.29- मुंबईतील पावसाचा जोर वाढत चालला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन घेतला परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ‘मी महापालिका आपतकालीन विभागाशी चर्चा केली असून मुंबई पोलिसांशी हॉटलाईनवरुन बोललो आहे. मंत्रालयातील कर्मचा-यांना लवकरात लवकर कामावरुन घरी जाण्यास सांगण्यात आल्याचं सांगितलं आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांनी अत्यंत गरजेचं असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन केलं आहे. सोबतच लोकांनी वाहतूक विभागाचा आदेश पाळण्याची विनंतीही केली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट किंवा फोन केल्यास पोलीस मदतीला धावून येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
गेल्या दोन दिवसापासून कोसळणा-या पावसाने मंगळवारी मुंबई-ठाण्यात अक्षरश: कहर केला. सोमवारी रात्री पावसाने जोर धरल्याने दादर हिंदमाता, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी आणि वांद्रे येथील अनेक भागात पाणी साचले असून मुंबईची दाणादाण उडाली आहे. ठाण्यातीही पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात पाणी साचले आहे.मुसळधार पावसामुळे रेल्वे, विमान सेवेवर परिणाम झाला असून मध्ये रेल्वे अर्धातास उशिराने सुरू आहे तर तांंत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वे काहीकाळ ठप्प झाली. त्यामुळे कामावर जाणा-या चाकरमान्यांचे मोठे हाल होत असीन रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे.गेल्या २४ तासात १५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार, अतिजोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला जोरदार झोडपले असून मुंबईची तुंबई झाली आहे. गेल्या २४ तासात १५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे.मुसळधार पावसामुळे अनेक कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या असून कर्मचा-यांना घरी सोडले आहे. मुंबईतील सकाळ आणि दुपारच्या सत्रातील शाळांनादेखील सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. दुपारनंतर कोणत्याही शाळेच्या बसेस रस्त्यावर धावणार नाही.वादळी वा-यासह कोसळणा-या या मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक धिम्या गतीने सुरू असून अनेक भागात झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. जोगेश्वरी, चर्चगेट जंक्शन आणि सात रस्ता येथे झाड पडल्याने वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.दादर टीटीजवळ पाणी साचल्याने वाहूतक कोंडी झाली आहे. वरळी, लालबाग, कुर्ला बस डेपो जंक्शन, एलबीएस रोड, कुर्ला वेस्ट या भागात पाणी साचले असून सिद्धीविनायक मंदिर परिसरातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आहे. या भागात गाड्या पाण्यातून मार्ग काढताना पहायला मिळत आहेत तर नागरिक या पाण्यातून मार्ग काढत सुखरूप स्थळी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
सकाळपासून कोसळणा-या या पावसामुळे नेहमी उशिरा धावणारी मध्य रेल्वे सकाळच्या वेळेस एक ते दोन तास उशिराने सुरू होती. मात्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. अनेक रेल्वे स्थानकात नागरिकांना सुचना देण्यात येत आहे.पश्चिम रेल्वेही विस्कळीत झाली आहे. पावसामुळे वांद्रे येथे तांत्रिक बिघाड झाल्याने प.रेची वाहतूक अर्धातास उशिराने सुरू आहे. तसेच ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे वांद्रे स्थानकात रोखण्यात आल्याची माहिती मिळत आहे.हार्बर रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली असून वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. अनेक स्थानकांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने त्यांनाही नद्याचं स्वरुप आलं आहे. नेहमी गर्दी असणा-या सीएसटी स्थानक तर ओस पडले आहे.कार्यालय लवकर सोडल्यामुळे अनेक रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी पहायला मिळत आहे. तर लोकलमध्ये अडकलेले नागरिक ट्रॅकवर उतरले असून सुखरूप ठिकाणी जाण्याचा मार्ग काढत आहेत.वादळी वा-यासह कोसळणा-या मुसळधार पावासमुळे हवाई वाहतूकीवरही परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारी विमाने थांवण्यात आले आहे. विमानांची उड्डाणे ३० ते ४० मिनिटे उशिराने होत आहेत.