अमरावती येथे रविवारी ‘आप’ची शेतकरी-शेतमजुर हक्क परिषद

0
9
मुंबई,दि.06- अमरावती येथे 10 सप्टेंबर रोजी ‘आप’ची शेतकरी-शेतमजुर हक्क परिषद होणार आहे. आम आदमी पक्ष शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देशव्यापी आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्यव्यापी शेतकरी शेतमजुर हक्क परिषद 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्री धर्मदाय कॉटन फंड मैदान, वालकट कंम्पाऊड, अमरावती येथे होणार असल्याचे मुकुंद किर्दत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संपूर्ण देशात शेतकरी संकटात आहे. या संकटातून बाहेर पडण्याचे स्वप्न लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीपूर्वी दाखवण्यात आले. निवडणूकीनंतर BJP ला सत्ता मिळाली आणि शेतकऱ्यांना मोदी आणि फडणवीस सरकार विसरले. त्यानंतर नोटबंदी करण्यात आली. यामुळे शेतमालाचे भाव निम्यापेक्षा खाली आले.शेतकरी आत्महत्या दुपट्टीने वाढल्या आहेत. केंद्र सरकारने कोर्टात शपथपत्रावर “आमचे सरकार स्वामिनाथन आयोग लागू करू करणार नाही कारण त्यामुळे अराजकता निर्माण होईल” असे सांगितले आहे. यामुळे संपूर्ण देशात शेतकऱ्यांचा रोष वाढला असुन, काही राज्यात आंदोलन सुरु झाले आहे. तर कुठे शेतकरी संपावर गेला आहे आणि त्याने शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप यशस्वी करून दाखवला आहे.
पंजाब, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात काही प्रमाणात कर्ज माफी दिली. परंतु त्यातील जाचक अटींमुळे बहुतांश शेतकरी या लाभापासून वंचित राहिला आहे. शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न सुटत नाहीत.शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक, परिस्थिती सुधारावी यासाठी पायाभूत शेती सुविधा निर्माण करून शेतीचा खर्च कमी व्हावा, स्वामिनाथन आयोगाची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी आम आदमी पक्षाने देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अंतर्गत संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रासोबत राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश अशा राज्यांतही शेतकऱ्यांची संघटना स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षाच्या वतीने येत्या ऑक्‍टोबरला नवी दिल्लीतील जंतरमंतरवर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येत्या 10 नोव्हेंबरला दिल्लीत अखिल भारतीय किसान रॅली काढण्यात येणार आहे.या अधिवेशनात संपूर्ण राज्यातील हजारो शेतकरी सहभागी होतील. तसेच राज्यातील सर्व शेतकरी नेते, शेती तज्ज्ञ, कृषी संशोधक उपस्थित राहतील. या अधिवेशनात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, कोल्हापूर भागातून शेतकरी सामील होणार आहेत.