श्रृती बडोले आणि अंतरिक्ष वाघमारेंच्या निवडीसाठी नियमात कुठलेही बदल नाही

0
29

निवड पूर्णत: गुणवत्तेनुसारच!

मुंबई, दि. 6 : सामाजिक न्याय विभागाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत राज्यातील ज्या 35 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, त्यात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि त्या विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांचे पाल्य असल्यावर माध्यमांकडून घेतला जात असलेला आक्षेप अतिशय चुकीचा आहे.श्रृती बडोले आणि अंतरिक्ष वाघमारे यांची निवड पूर्णपणे गुणवत्तेच्या निकषावरच करण्यात आली आहे.
श्रृती बडोले यांनी आयआयटी चेन्नईतून पदवीचे शिक्षण घेतले असून, लंडनमध्ये मास्टर ऑफ सायन्स केले आहे. आता अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स याविषयातील पीएच.डी.साठी त्यांचा प्रवेश झाला आहे. जागतिक मानांकनाच्या (क्यूएस) 29 क्रमांकाच्या विद्यापीठात त्यांना प्रवेश मिळाला आहे. त्याचप्रमाणे अंतरिक्ष वाघमारे यांना सुद्धा जागतिक मानांकनाच्या 95 क्रमांकाच्या विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे.
भारतात क्यूएस मानांकनाच्या पहिल्या 200 विद्यापीठांपैकी एकही विद्यापीठ नाही. त्यामुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या जागतिक मानांकनाच्या पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत असेल तर उत्पन्नाच्या मर्यादेचा विचार न करता, त्यांना प्राधान्य देण्यात येते.101 ते 300 या रँकिंगच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला असेल तर 6 लाख रूपये उत्पन्न मर्यादा आहे. त्यामुळे त्याही निकषात हे दोन्ही विद्यार्थी बसतात. शिवाय, त्यांचा समावेश व्हावा, म्हणून कुठल्याही प्रकारचे नियम बदलण्यात आलेले नाहीत. तसेच अर्ज करणाऱ्यांच्या यादीत त्यांची नावे असल्याने निवड समितीत आपण राहणार नाही,अशीच भूमिका मंत्री महोदय आणि संबंधित सचिवांनी घेतली. त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेतील समितीने ही निवड केली. जागतिक रँकिंगमध्ये असलेल्या पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे 28 विद्यार्थी पात्र ठरले, ही
महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या निवडीसाठी नियमात बदल नाही, पूर्णत: गुणवत्तेनुसार निवड असे सारे विषय स्वयंस्पष्ट असताना केवळ मंत्र्यांची कन्या आहे, म्हणून आरोप करणे गैर आहे.