…तरच शेतकरी सशक्त होईल! विठ्ठल वाघ

0
34

मुंबई,दि.01(विशेष प्रतिनिधी) – पक्ष, जात आणि धर्माच्या नावावर शेतकरी फोडायचे आणि मग झोडायचे, मूळ प्रश्नांपासून परावृत्त करायचे हेच राजकारण्यांचे धोरण चालू आहे. शाहू-फुले-आंबेडकरांनी जिवाच्या आकांताने जाती प्रथेवर प्रहार केले, पण जात अजूनही जात नाही. ती टाकल्यावाचून शेतकरी संघटित आणि सशक्त व्हायचा नाही, अशा शब्दांत लोककवी विठ्ठल वाघ यांनी शेतक-यांचे कान टोचले. मुंबईतील प्रभादेवी येथे बुधवारी पार पडलेल्या चौथ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून वाघ बोलत होते.
‘तुक्याने खणाचे कागद फाडले, इथे मढ्यावरही व्याज चढले!’ अशा शब्दांत लोककवी विठ्ठल वाघ यांनी सरकारला कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, शेतकºयांवर निष्ठा ठेवा, संत तुकाराम महाराजांनीही शेतकºयांवर विश्वास ठेवला होता. तुकाराम महाराज स्वत: सावकार होते. दुष्काळाच्या वर्षी तुकाराम महाराजांनी शेतकºयांकडून कर्जे वसूल केली नाहीत. मात्र वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हे कुणीतरी सांगायला हवे. हे सांगतानाच वाघ यांनी कवितेच्या स्वरूपात तुकाराम महाराजांनी सांगितलेली शेतकरी निष्ठा वर्णन केली.
वाघ यांनी राजकारण्यांसह शेतकºयांनाही मार्गदर्शन केले. शेतकरी आत्महत्यांचे सत्र कुठेतरी थांबले पाहिजे. मातीचा वास, गाईचा-म्हशीच्या दुधाचा वास याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. हे सगळे सोडून माणसे आज शहरातल्या झोपडपट्ट्यांत राहायला मजबूर होत आहेत. कृषीप्रधान देशातले हे दुर्दैव आहे. १९३५ साली ‘खेड्यातील वैभव पाहून विचार येतो, मनी नको ती शहरातील राहणी’ अशी कविता रचण्यात आली होती. मात्र याच ओळी आज उलट झाल्या आहेत. लग्न, सोयरीक आणि हुंडा हे आपण निर्माण केलेले भस्मासुर टाळायला हवेत. ‘मी मुलाच्या लग्नात फक्त सून घेऊन आलो. तरीही त्याला दोन मुले झाली,’ या त्यांच्या वाक्यावर हश्या पिकला. लग्नासाठी कर्ज काढू नका, जमिनी विकू नका, असे गाडगे महाराजांनी सांगितले होते. ते आज खºया अर्थाने अंमलात आणण्याची गरज आहे. राजकारणाच्या मागे लागू नका. निवडणुकांमुळे जातीयवाद वाढला. ही लोकशाही आहे, हा तुमचा भ्रम असून आगामी निवडणुकीत फॉर्म भरल्यास त्याचे उत्तर कळेल, असेही ते म्हणाले.
भूमी अधिग्रहण कायदा, आवश्यक वस्तू कायदा हे शेतकरीविरोधी कायदे असल्याची टीका अ‍ॅड. सतीश बोरूलकर आणि मधुसूदन हर्डे यांनी केली. या चर्चासत्रात मंत्रालयात विष प्राशन करून मृत झालेले शेतकरी धर्मा पाटील हे भूमी अधिग्रहण कायद्याचेच बळी असल्याचे सूर उमटले.
‘आलं वरिस राबूनं, आम्ही मरावं किती?’ या परिसंवादात अध्यक्षा शैलजा देशपांडे यांनी शेतकरी नेते शरद जोशी यांनी चांदवड येथे घेतलेल्या महिला शेतकरी अधिवेशनाची आठवण करून दिली. महिला सशक्तीकरणातील त्यांचा वाटा कधीही विसरता येणार नसल्याचे देशपांडे म्हणाल्या.
शहरी लोकांना खेड्यातील लोकांच्या दु:खाची जाण आहे. मात्र त्यांना मदत कशी करायची? याचा दुवा मिळत नव्हता. नाम फाउंडेशनने हा दुव्याचा प्रयत्न केला. मुंबईत होत असलेल्या शेतकरी संमेलनाने हाच दुवा होण्याचा प्रयत्न करावा. शहरी लोक नक्कीच खेड्याला साथ देतील. शेतकºयांसाठी काहीतरी केले पाहिजे, या जाणिवेतून ‘नाम’चे कार्य सुरू केले. आजही शेतकºयांकडून खूपकाही शिकत आहे, अशा शब्दांत संमेलनाचे उद्घाटक व अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपली भावना व्यक्त केली.३० कवींनी मांडली व्यथा : शेती आणि शेतकºयांच्या सध्यपरिस्थितीवर या संमेलनात सुमारे ३० कवींनी जळजळीत वास्तव मांडले. यादरम्यान झालेल्या परिसंवादात ‘तंत्रज्ञान व शेती’ तसेच शेतकरीविरोधी कायद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.