दहा किल्ल्यांच्या दुरुस्तीबाबतचा कृती आराखडा 3 महिन्यांत तयार करावा – विनोद तावडे

0
12

मुंबई : ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा दहा किल्ल्यांच्या दुरुस्तीबाबतचा कृती आराखडा प्रायोगिक स्वरुपात 3 महिन्यात तयार करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिले.
राज्यातील गड व किल्ले यांचे जतन व संवर्धन करण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीची पहिली आढावा बैठक श्री. तावडे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या सूचना त्यांनी समितीला केल्या.
श्री.तावडे म्हणाले, राज्यात सुमारे 317 किल्ले आहेत. या किल्ल्यांपैकी 47 किल्ले राष्ट्रीय संरक्षित असून ते केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहेत व 49 किल्ले राज्यसंरक्षित असून ते महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या अखत्यारित आहेत. या किल्ल्यांचे जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे योग्य रितीने व्हावीत यासाठी ती टप्प्याटप्प्याने करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक उपसमिती नेमून ऐतिहासिकदृष्ट्या अधिक महत्त्वाच्या किल्ल्यांपासून याची सुरुवात करणे योग्य ठरेल. याबाबत आवश्यक त्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येईल. केंद्रीय व राज्य पुरातत्व विभाग या दोन्हीमधील समन्वयासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार आहे.
यावेळी राज्यातील किल्ल्यांबाबतचे स्वतंत्र गॅझेट काढणे, दुर्गप्रेमींचे संमेलन भरवणे, सोयीनुसार जिल्हानिहाय समित्या नेमणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. ही समिती महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे मूळ स्वरुपात जतन करणे, त्याचे ऐतिहासिक महत्त्व कायम राखणे, या किल्ल्यांची दुरुस्ती, संरक्षण-संवर्धन व देखभाल करण्यासाठी काम करणार आहे.
श्री.तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर व पांडुरंग बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच समितीमध्ये ऋषिकेश यादव, राजेंद्र टिपरे, राजेंद्र शेळके, प्रमोद पाटील, भगवान चिले, वी.रा.पाटील, प्र.के.घाणेकर, सचिन जोशी, प्रफुल्ल माटेगावकर, संकेत कुलकर्णी यांचा समावेश आहे.