वसई-विरार महानगरपालिकेसाठी 14 जूनला मतदान

0
9

मुंबई दि. 16: वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 14 जून रोजी मतदान होणार असून 16 जून रोजी मतमोजणी होईल. राज्याचे निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी आज ही माहिती दिली. वसई-विरार मनपा निवडणुकीसाठी आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल.त्याचबरोबर अहमदनगर, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, मालेगाव, सोलापूर आणि परभणीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी 14 जून रोजीच मतदान होणार आहे.
वसई-विरार महानगरपालिकेच्या 115 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अहमदनगर (वॉर्ड क्र. 10-अ), उल्हासनगर (वॉर्ड क्र.6-अ), मीरा-भाईंदर (वॉर्ड क्र.38-अ), मालेगाव (वॉर्ड क्र.8-अ आणि वॉर्ड क्र. 4-अ), सोलापूर (वॉर्ड क्र.4-ब आणि 18-ब) आणि परभणी (वॉर्ड क्र.6-ब) या महानगरपालिकांच्या एकूण 8 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील मतदान घेतले जाईल.
मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. तर मतमोजणी 16 जून 2015 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरु होईल. निकाल घोषित झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.