23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home महाराष्ट्र आणेवारी पद्धतीत बदल करण्याबाबत सहा महिन्यात सकारात्मक निर्णय- एकनाथराव खडसे

आणेवारी पद्धतीत बदल करण्याबाबत सहा महिन्यात सकारात्मक निर्णय- एकनाथराव खडसे

0
24

मुंबई दि. २३-आणेवारी पद्धतीत बदल करण्याबाबत सहा महिन्यात राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
गेल्या 10 वर्षात धान खरेदी ज्या पद्धतीने होत होती त्याच पद्धतीने यावर्षी धान खरेदी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात गत हंगामातील कापूस व धान पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबतचा प्रश्न सदस्य संदीप बाजोरीया यांनी उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेतील उपप्रश्नाला उत्तर देताना श्री. खडसे बोलत होते. ते म्हणाले, ब्रिटीश काळापासून सुरू असलेली आणेवारी पद्धत बदलण्यासाठी राज्य शासनाने कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने आणेवारी पद्धत, पीक पद्धत, जमिनीचा पोत, भौगोलिक परिस्थिती आदीबाबतचा अभ्यास केला असून या समितीच्या शिफारसी मंत्रीमंडळासमोर मांडण्यात येतील. त्यानंतर येत्या सहा महिन्यात आणेवारी पद्धत बदलण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
गतवर्षीच्या खरीप हंगामातील बाधीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून 254 कोटी रुपयांची मागणी होती, त्यानुसार रक्कम वितरीत करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांचे बॅंक खाते आणि वारशाबाबत वाद असल्याने त्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा होऊ शकली नाही. हा निधी शासनाकडे परत आला नसून तो बॅंकेत जमा आहे. शेतकऱ्यांचे बॅंक खाते उघडल्यानंतर तो त्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य माणिकराव ठाकरे, जयंत पाटील, अनिल तटकरे, हुस्नबानू खलिफे यांनी भाग घेतला.
धान उत्पादक भागातील एकाही आमदाराने यात सहभाग घेतल्याचे दिसून आले नाही.विशेषत गोंदिया,भंडारा या जिल्ह्यातील आमदारांचा यात समावेश करावा लागेल

blank