झांसी,दि.10(वृत्तसंस्था) –केंद्रातील सत्ताधारी भाजप शहीद आणि देशभक्तीवर राजकारण करत असल्याचे आरोप उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लावला. एवढेच नव्हे, तर शहीद होणाऱ्यांमध्ये यूपी, एमपी, बिहार आणि दक्षिण भारताचेच जवान आहेत. गुजरातचे का नाहीत? असा खोचक यावेळी अखिलेश यादव यांनी उपस्थित केला. अखिलेश आपल्या कुटुंबियांसोबत झांसी येथे आले असताना त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला.
पक्षाच्या सदस्यत्व मोहिम अंतर्गत झांसी येथे पोहोचलेले अखिलेश यांनी भाजप केवळ शहीद, राष्ट्रप्रेम आणिवंदे मातरम अशा मुद्द्यांवर राजकारण करत आहे असा आरोप लावला. पूंछमध्ये पाकिस्तानच्या क्रूरतेचा बळी ठरलेल्या दोन जवानांचा उल्लेख करताना त्यांनी माध्यमांना सवाल केला. जवानांचे शिर कापले केवळ हेच का दाखवले जात आहे. शरीराचे कोण-कोणते भाग कापण्यात आले, तेही दाखवा.
अखिलेश यांनी शहीदांवर केलेल्या वक्तव्याचा यूपी उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी खरपूस समाचार घेतला आहे. मौर्य म्हणाले, “अखिलेश अजुनही पराभवाच्या धक्क्यातून सावरले नाहीत. त्यांचा संदेश जनता कधीच स्वीकारणार नाही.”