शेतकऱ्याने मुलींना नांगराला जुंपून नांगरले शेत

0
15

भोपाळ,दि.10 (वृत्तसंस्था) – आर्थिक व निसर्गाच्या लहरीपणाची झळ सोसत असलेल्या शेतकऱ्याची आणखी एक व्यथा मध्य प्रदेशात समोर आली आहे. शेत नांगरण्यास पैसे नसल्याने शेतकऱ्याने चक्क आपल्या दोन मुलींनाच नांगराला जुंपून शेत नांगरल्याचे विदारक सत्य समोर आले आहे.

देशभरात विविध राज्यांत शेतकऱ्यांची आंदोलने होत आहेत. मध्य प्रदेशातही शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या मागण्या काही प्रमाणात मान्य होत असल्या तरी आर्थिक अडचणीपुढे सर्वकाही शून्य आहे. मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील बसंतपूर येथील सरदार बरेला या शेतकऱ्याला शेत नांगरण्यासाठी पैसे नसल्याने आपल्या मुलांना नांगराला जुपावे लागले. या शेतकऱ्याच्या दोन्ही मुली नांगर घेऊन शेत नांगरत असल्याचे समोर आले आहे.

याविषयी बोलताना जिल्हा पंचायत अधिकारी आशीष शर्मा यांनी सांगितले, की आम्ही याबाबत त्या शेतकऱ्याशी बोलणे केले असून, त्याला मुलांना या कामात न आणण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्याला शक्य ती मदत देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

शेतकरी सरदार बरेला म्हणाले, की शेत नांगरण्यासाठी बैलजोडीची आवश्यकता असून, त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळेच मला मुलींना घेऊन शेत नांगरावे लागले. माझ्या दोन मुलींना आठवीतूनच शाळा सोडावी लागली आहे. त्यामुळे त्या आता मला शेतीमध्ये मदत करतात.