बनारस हिंदू विद्यापीठातील आंदोलनाला हिंसक वळण

0
11

वाराणसी, दि. 24(वृत्तसंस्था) – बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींशी होणाऱ्या छेडछाडीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आटोपल्यानंतर शनिवारी विद्यापीठाच्या आवारात हिंसाचार भडकला असून, मुलींच्या वसतिगृहांमधून पोलीस आणि अर्धसैनिक दलांच्या जवानांवर दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. व्हीसी लॉजजवळ पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याचे वृत्त आल्यानंतर हा हिंसाचार भडकला. हे विद्यार्थी छेडछाडीच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या विद्यार्थिनींचे समर्थन करत आहेत.  रात्री 12 वाजल्यानंतर बीएचयूच्या वसतिगृहांमधून पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. या हिंसक घटनांमुळे विद्यापीठ 2 ऑक्टोबरपर्यंत बंद करण्यात आले आहे.
रात्री 10 वाजण्याच्या सुमारास  कुलगुरू जी.सी. त्रिपाठी यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शन करण्यासाठी निघालेल्या विद्यार्थांवर सुरक्षा रक्षकांनी लाठीमार केला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर विद्यार्थ्याचा संतापाचा भडका उडाला. त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेक सुरक्षारक्षही जखमी झाले. तसेच बीएचयूच्या वसतीगृहांमधून पोलीस आणि सुरक्षारक्षकांवर पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सर सुंदरलाल रुग्णालयात घुसून दगडफेक केली. त्यामुळे तेथे गोंधळाचे वातावरण  निर्माण झाले. तसेच रुग्णांनाही अडचणींचा सामना करावा लागला. हिंसक झालेल्या विद्यार्थ्यांनी जाळपोळ आणि तोडफोड सुरू केली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 23 ठाण्यांच्या पथकांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच हवेत बंदुकीच्या 18 फैरी झाडल्या.