मतदारांच्या अपेक्षा आणि सरकारच्या धोरणात बरीच तफावत

0
4

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,-
दिल्लीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मतदारांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा आणि सरकारी धोरणांमध्ये बरीच तफावत असल्याचे आढळून आले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) आणि दक्ष यांनी केलेल्या संयुक्त सर्वेक्षणाचे निष्कर्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठविण्यात आले आहेत. दिल्लीतील जनतेच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ब्लूप्रिंट तयार करण्यात यावी आणि उपस्थित करण्यात आलेले मुद्दे सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी डिसेंबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जनतेला त्यांच्या भागातील ३० महत्त्वाच्या प्रश्‍नांवर मत नोंदविण्यास सांगण्यात आले. यावरून सरकारी कामकाजाचे आणि जनतेने दिलेल्या उत्तरांचे अध्ययन करण्यात आले. पिण्याचे पाणी, विजेचा पुरवठा, कायदा आणि सुव्यवस्था, रस्ते, सार्वजनिक वाहतूक, शाळा, नोकरीच्या उत्तम संधी, महिलांची सुरक्षा, स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा या गोष्टींना जनतेने पहिल्या दहा प्रमुख बाबींमधे प्राधान्य दिले आहे. मतदारांचे प्राधान्य आणि जनतेच्या अपेक्षांबद्दल असलेली सरकारची कार्यक्षमता यात बरीच तफावत आढळून आली. लोकांनी दर्शविलेल्या गरजांमध्ये बदल झाला असून सरकारकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षांमध्ये वाढ झाली आहे.
या अहवालाची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि कामकाजाचा जाहीरनामा प्रसिद्ध करून जनतेच्या मागणीवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी शिफारस या अहवालातून करण्यात आली आहे.