भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा;कार्यकारीणी सदस्यात गोंदियाचे कुथे

0
24

नवीन कार्यकारिणीमध्ये १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस,र १६ चिटणीसांचा समावेश

मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बुधवारी पत्रकार परिषदेत केली. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, महाविजय अभियानाचे संयोजक आमदार श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, अ‍ॅड. माधवी नाईक, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश समन्वयक विश्वास पाठक आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, उपाध्यक्षपदी माधव भांडारी, सुरेश हाळवणकर, चैनसुख संचेती, जयप्रकाश ठाकूर, अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, एजाज देशमुख, राजेंद्र गावीत आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी आमदार रणधीर सावरकर, अ‍ॅड. माधवी नाईक, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी भरत पाटील, अ‍ॅड. वर्षा डहाळे, अरुण मुंडे, महेश जाधव आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी आमदार मिहीर कोटेचा, प्रदेश मुख्यालय प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विभागीय संघटनमंत्रीपदी उपेंद्र कोठेकर (विदर्भ), मकरंद देशपांडे (पश्चिम महाराष्ट्र), संजय कौडगे (मराठवाडा), शैलेश दळवी (कोकण), हेमंत म्हात्रे (ठाणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विजया रहाटकर, केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यमंत्री, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हिना गावित, राज्यातील सर्व खासदार, आमदार आदींचा समावेश आहे. याखेरीज २८८ विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक आणि ७०५ मंडलांचे प्रभारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की राज्यातील १ कोटी नागरिकांशी संपर्क साधून त्यांना ‘सरल अ‍ॅप’ द्वारे मोदी सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांची माहिती दररोज देण्याची यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या संपर्क अभियानात सहभागी होत आहेत.