आमदारकी खासदारकी गेली तरी पर्वा नाही पण कर्जमाफी घेणारच: अशोक चव्हाण

0
15
नाशिक दि.17 – आम्हा सर्वांची आमदारकी खासदारकी गेली तरी पर्वा नाही पण संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शेतक-यांना केले आहे.शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी  विरोधी पक्षांची संयुक्त संघर्ष यात्रा आज नाशिक जिल्ह्यात पोहोचली. नामपूर बाजार समिती मैदानावर विराट सभेला संबोधित करताना चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, राज्यात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत मात्र सरकारची संवेदनशीलता संपली आहे. कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारला उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाचा अभ्यास करावा लागतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुरु झालेला हा संघर्ष कर्जमाफी मिळेपर्यंत थांबणार नसून सरकारला संपूर्ण कर्जमाफी द्यावीच लागेल असे चव्हाण म्हणाले.
विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, खासदारांच्या विमान प्रवासासाठी मंत्र्यांची कॉलर पकडणारे शिवसेना नेते कर्जमाफीच्या मुद्द्यावर का गप्प आहेत? ही लढाई शेतक-यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय थांबणार नाही. आगामी काळात रस्त्यावर उतरून सरकार विरोधातील लढा आणखी तीव्र करू असा इशारा विखे पाटील यांनी सरकारला दिला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजप सरकाच्या कामावर कुठलाही वर्ग समाधानी नाही.पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु आझमी शेकाप नेते प्रवीण गायकवाड यांनीही सरकारवर सडकून टीका करत कर्जमाफी मिळेपर्यंत हा लढा सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले.यावेळी  माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील,  राजेश टोपे, शशिकांत शिंदे, आ. भाई जगताप, आ.पंकज भुजबळ, आ. गोपालदास अग्रवाल, आ. डी. पी. सावंत, आ. अमर राजूरकर, आ. वसंत चव्हाण, आ. सुधीर तांबे, आ. प्रदीप नाईक, आ. चंद्रकांत रघुवंशी आ.दिपिका चव्हाण, आ. विद्या चव्हाण, आ. यशोमती ठाकूर, पीपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी, शेकापचे प्रविण गायकवाड, संघर्ष यात्रेचे समन्वयक आ. जितेंद्र आव्हाड आणि आ. सुनिल केदार यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.