सत्तेपूर्वी मुख्यमंत्री कर्जमाफी मागायचे, आता ते अभ्यासू विद्यार्थी झालेत: उद्धव ठाकरे

0
14

नाशिक,दि.19: महाराष्ट्रात सरकार बदल होऊन अडीच वर्षे झाली, मात्र काहीच बदललं नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, आम्ही बाहेरुन विनाशर्त पाठिंबा देतो, कर्जमाफी केल्यास सरकारला धक्का लागू देणार नाही, असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. ते शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.“मुख्यमंत्री विरोधात असताना कर्जमाफी मागायचे,आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांत रुपांतर झाले.सरकार बदलले पण प्रश्न सुटत नाहीत.मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय, शेतकरी कर्ज मुक्त करा,माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देतील”,असे उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणुकीपूर्वी काळा पैसा भारतात आणू, त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, असं सांगितलं जात होतं, मात्र एकही पैसा आला नाही. आता शेतकऱ्याची कर्जमाफी करा किंवा त्याच्या खात्यात 15 लाख रुपये भरा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.महत्त्वाचं म्हणजे या मेळाव्याला शिवसेनेच्या आमदार-खासदारांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टीही उपस्थित होते.यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.“गाडीवरचा दिवा गेला पण यांच्या मनातला गेला नाही. दानवेंच्या वक्तव्याने तळपायाची आग मस्तकात गेली. आता शेतकरी रडणार नाही साल्यांची सालपटं काढतील”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे आम्ही कपाळकरंटे नाही. कर्जमाफी तात्पुरता इलाज असेल, पण तात्पुरता तरी इलाज करा, पुढचं पुढं बघू, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.