शेतकरी आंदोलनाची धार कमी करण्यासाठीच सरकारकडून शिवाजी महाराजांच्या नावाची ढाल– शशिकांत शिंदे

0
13

मुंबई.(विशेष प्रतिनिधी)दि.२६:सरसकट संपुर्ण कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी ऐतिहासिक आंदोलन व संपाचे हत्यार उपसले होते. अखेर शेतकऱ्यांच्या एकीपुढे सरकारला झुकावे लागले. परंतु सरकारने जाचक अटी व निकष लावून केवळ दीड लाख रुपयांची कर्जमाफी देऊन राज्यातील शेतकऱ्यांची बोळवण केली आणि या कर्जमाफीच्या योजनेला ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान’ योजना असे नाव देऊन शेतकरी आंदोलनाची धार कमी करण्याचा डाव खेळला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी पक्षाकडून नियम २९३ अन्वये उपस्थित कर्जमाफीच्या प्रस्तावावरील चर्चेत बोलताना केला. पुढे ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज ही मराठी मनाची अस्मिता आहे. आणि आमच्या शेतकरी, कष्टकरी, गोर-गरिब रयतेचे दैवत आहेत. त्यामुळे जिथे शिवाजी महाराजांचे नाव येते, तिथे ही महाराष्ट्रातील जनता नतमस्तक होत असते आणि हे हेरुनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव योजनेला देऊन शेतकरी आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने शिवाजी महाराजांच्या नावाखाली राज्यातील जनेतेची शुध्द फसवणुक करण्याचा सपाटा लावला असून , हा शिवाजी महारांजाच्या नावाचा अवमान आहे आणि हा अवमान राज्यातील जनता कदापी सहन करणार नाही असा टोला शशिकांत शिंदे यांनी फडणवीस सरकारला लगावला.