राष्ट्रवादीच्या हल्लाबोलमुळे सरकारला धडकी भरली – सुनिल तटकरे

0
8

# शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी हा लढा असाच सुरु ठेवणार

नागपूर. ( शाहरुख मुलाणी ),दि.11 – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोलमुळे सरकारला धडकी भरली आणि त्यांच्या पायाखालची जमिन सरकली म्हणून सत्ताधारी काहीही टिका करत सुटले.या सरकारला जमिनीवर आणण्याची वेळ आली आहे.जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लढा सुरुच ठेवणार असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पदयात्रेच्या समारोप सभेत केला.
ऐतिहासिक पदयात्रेचा या विभागात समारोप होत आहे. १९८० साली पवारसाहेबांनी अशी पदयात्रा काढली होती. आज पुन्हा एकदा लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ होती.त्यामुळे ही पदयात्रा काढली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो असे तटकरे म्हणाले. भाजपने बळीराजाकडे दुर्लक्ष केले म्हणून बळीराजा अडचणीत सापडला. निवडणूकांसाठी नाही तर सामान्यांचे प्रश्न सुटावे यासाठी ही पदयात्रा आम्ही काढली होती. या पदयात्रेमध्ये महिलांचा मोठयाप्रमाणात सहभाग होता. ही बाब समाधानकारक आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. नागपूर शहरातील काँग्रेस नगर टी पॉईंट येथे सभा पार पडली. या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,माजी मंत्री जयंत पाटील,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अनिल देशमुख,पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार हेमंत टकले, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार संदीप बजोरिया, माजी खासदार आनंद परांजपे,आदींसह पक्षाचे सर्व आमदार,पदाधिकारी उपस्थित होते.