मुंबई/नांदेड. ( शाहरुख मुलाणी ) – महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या छोट्याशा तेलंगणा राज्याला कर्जमाफी ही देता येते आणि मोफत वीज हि देता येते, महाराष्ट्रात मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफीही द्यावी आणि तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 16 जानेवारीपासून मराठवाड्यात काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या पूर्वतयारीसाठी मुंडे आज नांदेड ते आले होते कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. शेतकऱ्यांना वाढीव दिलेली विजेची बिले ही मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. कापसावरील बोन्ड अळीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल जाहीर केलेली मदत फसवी आहे. बियाणे कंपन्या मदत देण्यास तयार नाहीत त्या मोन्सेटो कंपनी कडे बोट दाखवत आहेत, ही कंपनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल मग शेतकऱ्यांना मदत केंव्हा मिळणार ? असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. या यात्रेदरम्यान नांदेड जिल्ह्यात लोहा, उमरी व माहूर अशा 3 ठिकाणी सभा होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस माजी मंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर, आ. विक्रम काळे, माजी खासदार गंगाधरराव कुंटुरकर, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस सौ.सोनालीताई देशमुख, शहराध्यक्ष डॉ. सुनिल कदम, विक्रम देशमुख, फिरोज लाला, किशोर देशमुख आदी उपस्थित होते.