राज ठाकरेंनी राजकारण सोडून आता फुलटाईम कार्टुनिस्ट व्हावे- आशिष शेलार

0
17

मुंबई- राज ठाकरे यांनी यापुढील काळात राजकारण सोडून फुलटाईम कार्टूनिस्ट व्हावे असा सल्ला मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्याने राज यांच्याकडे कोणतेही सांगण्यासारखे काम नाही. त्यामुळे प्रसिद्धीत राहण्यासाठी राज मोदींसारख्या बड्या नेत्यांवर टिप्पणी करीत आहेत, अशी टीकाही शेलार यांनी केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पुरते पानिपत झाल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काढलेले व्यंगचित्र भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच दिल्लीतील भाजपच्या पराभवाबाबत राज ठाकरेंनी जबाबदार धरल्यानंतर मोदी-शहा जोडगळीवर व्यंगचित्र काढून या पॉवरफुल नेत्यांच्या सत्तेला अरविंद केजरीवाल यांनी कसा हादरा दिला ते व्यंगचित्रातून दाखविले होते.
उद्धव ठाकरे यांच्यासह देशभरातील मोदी विरोधक व भाजपविरोधी पक्षांनी दिल्लीतील भाजपच्या पराभवाला नरेंद्र मोदी हेच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत. त्यातच राज्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही मोदींवर लागोपाठ दिवस टीका केली आहे. आता त्यांचे बंधू व मोदींचे एकेकाळचे समर्थक राज ठाकरे यांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केल्याने भाजप अस्वस्थ आहे.