बोगस मतदानावरून राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते व पोलिसांदरम्यान बाचाबाची

0
15

नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेच्या 111 प्रभागांसाठी आज (बुधवारी) किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 42 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. मतदानाची एकूण टक्केवारी हाती आली नसली तरी 65 टक्के मतदान होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 111 प्रभागासाठी 564 उमेदवारांचे भविष्य मतदारांनी मतदान यंत्रात बंद केले असून गुरुवारी मतमोजणी होणार आहे.
नवी मुंबईत गोठवली गावात तणाव न‍िर्माण झाला होता. बोगस मतदानावरून राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते व पोलिसांदरम्यान बाचाबाची झाली. दुसरीकडे, आम्हाला 70 जणांना सहा गाड्यांमधून एका कॉन्ट्रॅक्टरने घड्याळाला मत देण्यासाठी आणल्याची बोगस मतदारांनी कॅमेर्‍यासमोर कबुली दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा पद्धतीने बोगस मतदान करते, असा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला.
दुसरीकडे, नेरुळमधील कुकशेत गावातील प्रभाग क्रमांक 85 मध्ये 70 जणांनी बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काही जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, नवी मुंबईतील जवळपास सर्वच मतदान केंद्रांच्या बाहेर मोठ्याप्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. गळ्या मतदान केंद्रांवर भरारी पथके आणि सीसीटीव्ही तैनात करण्यात आले होते. मात्र,उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारी मतदारांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसले.