मुंबई(वृत्तसंस्था)दि.22- सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जी चर्चा झाली याबाबतची संपूर्ण माहिती आघाडीतील मित्र पक्षांना देण्यात आली असून भाजप वगळून सरकार स्थापन व्हावे असे मित्र पक्षांनाही वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडीतील मित्रपक्षाच्या नेत्यांसोबत आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना,शेकाप, रिपाई कवाडे गट, समाजवादी पार्टी, जनता दल, रिपाई खरात गट, श्रमिक मुक्ती दल, आदींसह इतर सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.त्यांच्याशी आज चर्चा केली.विकासासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे सांगितले असल्याचे जयंत पाटील म्हणाले. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेबरोबर आज किंवा उद्या चर्चा करेल आणि त्यानंतर चर्चा झाल्यावर सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.





