मुंबई,दि.26 – राज्यात सुरु असलेल्या सत्तापेचातील घडामोडीला नवीन वळण आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्रिपदासाठी तयार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीचे नेतृत्व करणार असल्याचा दावा शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केला होता. तर पुढील पाच वर्षांसाठी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार या वृत्ताला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. आज दुपारी पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 22 नोव्हेंबर रोजी ठाकरे कुटुंबातील सदस्य मुख्यमंत्री होणार हे निश्चित केले होते. ते म्हणाले होते की, ‘नव्या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरेच करतील, याविषयी आमच्या सर्वांचेच एकमत आहे.’ अखेर आज शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केलेल्या दाव्यानंतर आजवर राजकारणात ‘रिमोट कंट्रोल’ची भूमिका निभावणाऱ्या ठाकरे घराण्याच्या हाती आता राज्याचा कारभार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर रोजी अजित पवारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यामुळे शिवसेनेच्या मनसुब्यापर पाणी फेरले होते. बहुमत नसताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यावर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीने आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत 30 तासांत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.





