भाजपवरील विश्वास उडाला : प्रकाश गजभिये

0
8

नागपूर दि.२९–: वेगळ्या राज्याचे स्वप्न दाखवून भाजपने वैदर्भीय जनतेला भावनिक साद घालून यश मिळवल्यानंतर आता घुमजाव केल्याने सर्वसामान्यांचा त्यांच्यावरून विश्वास उडाला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी वेगळ्या विदर्भाबाबत कुठलाही शब्द दिला नव्हता, असे सांगणे म्हणजे अनेक वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या वैदर्भीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. भाजपने जाहीरनाम्याखेरीज अनेक घोषणा करून आश्वासने दिली. त्यातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणे, एलबीटी रद्द करणे, टोल टॅक्स मुक्त राज्याच्या केलेल्या घोषणा पोकळ ठरल्या. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे अनेक आश्वासन दिले. दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आल्यानंतरही भाजप सरकारने मदतीचा अपेक्षित हात दिला नाही. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या या नेत्यांनी संवेदनाशून्य असल्याचा परिचय दिला. बळीराजाला विश्वास, सहानुभूती दाखवण्याऐवजी उलट त्यांना वाऱ्यावर सोडले. विदर्भाबाबतही त्यांचे धोरण असेच असल्याचे गजभिये म्हणाले.