जवानांसाठी पाकला धूळ चारणार: हॉकी संघ

0
12

बंगळूर (वृत्तसंस्था) : ‘हॉकीमध्ये पाकिस्तानला धूळ चारून उरीतील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देऊ‘ असा निर्धार भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश याने आज (बुधवार) व्यक्त केला. पुढील महिन्यात मलेशियामध्ये आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत 23 ऑक्‍टोबर रोजी भारताची गाठ पाकिस्तानशी पडणार आहे. 

श्रीजेशने थेट उरी हल्ल्याचा उल्लेख केला नाही; मात्र ‘पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारून आम्ही आमच्या जवानांना निराश करणार नाही‘ असे उद्गार काढले. उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान हुतात्मा झाले. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्यासाठी भारताने आक्रमक प्रयत्न सुरू केले आहेत. 

पुढील महिन्यात 20 ते 30 ऑक्‍टोबर या कालावधीत आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार आहे. यात साखळी फेरीत 23 ऑक्‍टोबर रोजी भारत-पाकिस्तान लढत होणार आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत.