महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षल्‍यांकडून दोघांची हत्या

0
2

धानोरा, दि. ३०: नक्षल्यांनी दोन युवकांची गळा चिरुन हत्या केल्याची घटना आज सकाळी गडचिरोली-राजनांदगाव या आंतरराज्यीय महामार्गावरील सावरगावनजीक उघडकीस आली. ब्रिजलाल उसेंडी व अनिल काल्को दोघेही रा.केरगट्टा(छत्तीसगड) अशी मृतांची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी ही हत्या केल्याचा अंदाज आहे.
सावरगाव हे गाव महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर वसले आहे. सावरगावपासून अर्धा किलोमीटर अंतरावर दोन युवकांचे मृतदेह आज सकाळी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना आढळून आले. सुरुवातीला दोघांचा मृत्यू अपघातात झाला असावा, असे नागरिकांना वाटले. मात्र घटनास्थळी नक्षल पत्रके आढळून आली. त्यात आणखी ७ जणांची नावे लिहिली असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून उत्तर व दक्षिण गडचिरोलीत नक्षलभरती बंद आहे. मात्र छत्तीसगडमधील बस्तरमधून अजूनही नक्षल भरती सुरुच आहे. तेथील नक्षली गडचिरोली जिल्हयात येत असून, विध्वसंक कारवाया करीत आहेत,अशी चर्चा आहे.