महाराष्ट्र सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारली; गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये निर्णय

0
13

मुंबई – राज्य सरकारने परवानगी मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला नाकारली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे मुंबई, ठाण्यासहीत राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात का होईना पण दहीहंडी उत्सवाला परवानगी द्यावी, अशी मागणी गोविंदा पथकाच्या प्रतिनिधींनी केली होती. जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली. तसेच सर्व गोविंदांना लशीचे दोन डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल, असे या बैठकीमध्ये समन्वय समितीने सरकारला सांगितले.

दहीहंडी साजरी केल्यामुळे कोरोनाचा प्रभाव जास्त मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो, असे टास्क फोर्सने सांगितल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. जागतिक स्तरावर हा उत्सव टीकावा, अशी बाजू समन्वय समितीने मांडली. गणेशोत्सवाप्रमाणे नियम आखण्याची मागणीही समितीने केली. पण बैठकीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी का देऊ शकत नाही, हे समन्वय समितीच्या सदस्यांना समजावून सांगितले.

एकदा परवानगी दिली आणि प्रभाव वाढला तर उत्सवाला आणि संस्कृतीला गालबोट लागेल. यावेळी तुमची इच्छा असली, तरी सरसकट परवानगी देता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आम्ही गोविंदा पथकांवर लक्ष कसे ठेवणार. यंत्रणांवरील ताण वैगेरे पाहता मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आवाहन केले आहे. परवानगी नसल्यामुळे आम्ही दहीहंडीचे आयोजन न करण्याची भूमिका घेणार आहोत, असे समन्वय समितीने सांगितले आहे.

दुपारी साडेबाराच्या सुमारास दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक सुरु झाली. वेगवेगळ्या दहीहंडी मंडळांनी राज्य सरकारने छोट्या प्रमाणात का असेना दहीहंडी साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. ही बैठक आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली.