राणा दाम्पत्याला न्यायालयाची नोटीस:जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाची विचारणा- जामीन रद्द का करू नये?

0
24

मुंबई- सत्र न्यायालयाने राणा दाम्पताला जामिनाच्या अटीचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक नोटीस बजावली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पताला जामीन मंजूर केला होता, त्यावेळी कोर्टाने काही अटीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या अटीचे उल्लंघन झाल्याचे सरकारी वकीलांचे म्हणणे आहे. त्यावरून मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. जामीन रद्द करण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश कोर्टाने दिलेले नाहीत.

राणा दाम्पत्यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर नवनीत कौर राणा यांना मानदुखीचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी 11 वाजेदरम्यान नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. राणांनी यादरम्यान काही वक्तव्ये केली होती. प्रसारमाध्यमांशी बोलू नका, अशी अट जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर होताना घातली होती. मात्र, काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधून त्यांनी कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

राणा दाम्पत्याचे जामीन रद्द करण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश न्यायालयाने दिलेले नाही. त्यामुळे हा मोठा दिलासा राणा दाम्पत्याला म्हणावे लागेल. पंरतु राज्य सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, नवनीत राणांनी रुग्णालयातून बाहेर येताच राज्य सरकार आणि हनुमान चालिसावर वक्तव्य केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देखील राणांनी निवडणूक लढण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे राणा यांनी कायदा मोडल्याची याचिका राज्य सरकारकडून दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने जामीन मंजूर करताना म्हटले होते की, जर एकाही अटीचे उल्लंघन झाले तर जामीन रद्द केला जाऊ शकतो. मात्र, सध्या कोर्टाने केवळ राणा दाम्पत्याला आपली भूमिका स्पष्ट करण्याची नोटीस पाठवली आहे. त्यावर सुनावणी नेमकी कधी होईल याची माहिती कोर्टाने दिलेली नाही.

न्यायालय आम्हाला पुन्हा न्याय देईल- रवी राणा

दरम्यान, न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर राणा दाम्पत्यानी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केलेले नाही, टीकेला उत्तर देणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. आम्ही वकिलांशी चर्चा केली आहे. आम्ही आमचा जबाब न्यायालायात दाखल करणार आणि आम्हाला पुन्हा न्यायालय न्याय देईल, अशी प्रतिक्रिया रवी राणांनी दिली आहे.

तेव्हा उद्धवजींना दु:ख कळेल

राज्यात त्यांची सत्ता आहे, ते सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. त्यामुळेच त्यांनी आमच्यावर कारवाई केली. न्यायालयाने मज्जाव केलेल्या विषयांवर आम्ही कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केलेले नाही. उद्धव ठाकरेंना नैतिकतेची भाषा करण्याचा कोणताही अधिकार नाही. आदित्य ठाकरेंवर गुन्हा नसताना अटक होईल तेव्हा उद्धवजींना दु:ख कळेल, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे.

बाळासाहेब ठाकरे हे पदासाठी नव्हे तर हिंदुत्वासाठी लढले

फ्लॅट बिल्डरने बांधला परवानगी पालिकेने दिली, मग नोटीस मला का देण्यात आली, असा सवालदेखील यावेळी नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. बाळासाहेब ठाकरे हे पदासाठी नव्हे तर हिंदुत्वासाठी लढले, मात्र आताच्या शिवसेनेने हिंदुत्वाची विचारधारा सोडली आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा

यापुढेही माझा लढा हा सुरूच राहणार आहे. माझ्यावर कारागृहात जो अत्याचार झाला त्याबद्दल मी लवकरच बोलेन, आम्ही कारवाईला घाबरणार नाहीत. कारागृहात मिळालेल्या वागणुकीमुळे मला मानसिक त्रास झाला असल्याचेही नवनीत राणा म्हणाल्या.

माझ्याविरोधात उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवून दाखवावी- नवनीत राणा

ठाकरे सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. महापालिका निवडणुकीत जनता ठाकरेंना उत्तर देईल. राम, हनुमानाचा विरोध केल्याची शिक्षा निवडणुकीत त्यांना मिळेल. हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे थेट आव्हान नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले. मुंबई महापालिकेत शिवसेनेविरोधात आपण प्रचार करणार आहोत. पालिका निवडणुकीत जनता त्यांना उत्तर देईल, असेही राणा म्हणाल्या.

संजय राऊतांचा पोपट म्हणून उल्लेख

नवनीत राणांनी शिवसेना खासदार संजय राऊतांचा उल्लेख पोपट म्हणून केला आहे. आपण संजय राऊतांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. संजय राऊतांनी 20 फूट खोल खड्ड्यात गाडण्याची भाषा केली, त्यामुळे आपण त्यांची तक्रार थेट केंद्राकडे करणार असल्याचे राणा म्हणाल्या.

बाळासाहेबांची शिवसेना असली होती

अयोध्येत शिवसेनेकडून करण्यात आलेल्या बॅनरबाजीवर देखील नवनीत राणा यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना असली होती, लवकरच असली कोण नकली कोण हे कळणार आहे. सध्याच्या शिवसेनेवर असली-नकली सिद्ध करण्याची वेळ आली. असे नवनीत राणा म्हणाल्या.