वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.16- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये 19 ते 23 जूनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे फेरबदल करण्याची शक्यता राजकीय वतुर्ळात वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारे बिहारचे खासदार गिरिराज सिंह यांची सुटी केली जाऊ शकते. संभाव्य मंत्रिपदासाठी राजस्थानचे नेता ओम माथूर आणि अर्जुन मेघवाल यांच्यासह इतर तिघे स्पर्धेत आहेत.
या शिवाय उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनोज सिन्हा आणि संजीव बालियान यांना ‘प्रमोट’ केले जाऊ शकते. हे दोघे सध्या राज्यमंत्री आहेत. ऊर्जा मंत्रालयाचा स्वतंत्रपणे गाडा हाकरणारे पीयूष गोयल यांनाही पक्ष ‘प्रमोट’ करू शकतो.
हे आहेत मंत्रिपदाचे दावेदार…
1. राज्यसभा सदस्य ओम माथूर यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकते. सध्या त्यांच्यावर उत्तर प्रदेश भाजपची धुरा आहे.
2. अलाहाबादचे खासदार श्याम चरण गुप्ता यांचेही नाव जोरकसपणे चर्चेत आहे. त्यांना मंत्री केल्यास यूपी विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो.
3. बिकानेरचे खासदार अर्जुन मेघवाल हेसुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
4. आसामचे रमेन डेका यांचाही पक्ष विचार करत आहे.
5. विनय सहस्त्रबुद्धे हेसुद्धा मंत्रीपदाचे दावेदार आहेत. सध्या ते राज्यसभा सदस्य आहेत.आणि राष्ट्रीय स्वयसेवंक संघाचे सदस्य आहेत.
यांना मिळणार डच्चू ?
> लघू उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह हे कायम वाद ओढून घेतात. त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो.
> अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांचेही पद धोक्यात आहे.
> बलात्काराचा आरोप असलेले रसायन मंत्री निहालचंद यांनाही डच्चू दिला जाऊ शकतो.
> मोदी मंत्रिमंडळाने 26 मे 2014 रोजी शपथ घेतली होती.
> त्या नंतर केवळ नोव्हेंबर 2014 मध्ये कॅबिनेटमध्ये बदल गेला.
> त्यावेळी शिवसेनेचे सुरेश प्रभू आणि गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना स्थान देण्यात आले होते.
कोणत्या राज्यातून किती मंत्री ?
> एकूण मंत्री : 66
> उत्तर प्रदेश : 13
> बिहार : 8
> महाराष्ट्र : 7
> कॅबिनेटमध्ये 8 महिला
> 34 मंत्री स्पेशलिस्ट, यात 15 वकील.
> 7 मंत्री संघाचे स्वयंसेवक