महाड पुल दुर्घटना युध्दपातळीवर शोधमोहिम सुरु

0
10

अलिबाग दि.3 :- मुंबई गोवा महामार्गावरील महाड पोलादपूर दरम्यानच्या सावित्री नदीवरील पुल काल रात्री 11.30 च्या दरम्यान पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. यामध्ये दोन एस.टी.बसेस तसेच काही खाजगी गाडया वाहून गेल्या असण्याची शक्यता आहे. त्याबाबत शोध मोहिम युध्द पातळीवर सुरु आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावरील महाड बिरवाडी जवळ
सावित्री नदीवरील जुना पुल वाहून गेल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास कळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले तसेच पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी
महाडच्या प्रांत श्रीमती सुषमा सातपुते व त्यांच्या सहकार्यांनी परिस्थिती हातळण्यास सुरुवात केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय हे रात्री
पासूनच घटनेची माहिती घेऊन लक्ष ठेवून आहेत. तसेच या दुर्घटनेचे
गांभीर्य लक्षात घेता हवाई दलाचे हेलिकॉप्टर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद
दल, नौदल, तटरक्षक दल यांची मदत घेण्यात आली. 35 पोहणारे स्थानिक नागरीक,7 रिव्हर राफटिंग टिम यांच्या मदतीने शोध कार्यास प्रारंभ करण्यात आला.

या दुर्घटनेत एस.टी. महामंडळाची जयगड- मुंबई बस क्र.एम.एच.20 डी.एल.1538 व राजापूर-बोरीवली बस क्र. एम.एच.40 एन.9729 या दोन बस तसेच इतर काही खाजगी वाहने वाहून गेल्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्रीरायगड प्रकाश महेता, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा.उपक्रम) एकनाथ शिंदे तसेच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील सांय. 4 च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले आहेत.