30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Top News स्नेहमिलन कार्यक्रम बेतला जिवावर,९ जणांना जलसमाधी

स्नेहमिलन कार्यक्रम बेतला जिवावर,९ जणांना जलसमाधी

0
132
नाशिक,दि.०४- जिल्ह्यातील दिंडोरी येथे शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रस्ता सोडून कार थेट शेतातील विहिरीत कोसळल्याने दरगोडे कुटुंबातील ९ सदस्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या मृतांमध्ये ५ निष्पाप विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
दिंडोरीतील शिवाजीनगर भागात असलेल्या एका मंगल कार्यालयात खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब आपल्या इर्टिका कारने आले होते. कार्यक्रम संपवून रात्री १० च्या सुमारास हे कुटुंब घराकडे जाण्यासाठी निघाले. मात्र, मंगल कार्यालयापासून काही अंतरावरच चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याशेजारील पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, नगरपंचायतीचे अग्निशामक दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने आणि रात्रीची वेळ असल्याने मदतकार्यात सुरुवातीला मोठे अडथळे आले. मात्र, क्रेन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर विहिरीतून कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले.
एकाच कुटुंबातील नऊ जणांवर अंत्यसंस्काराची वेळ
या हृदयद्रावक घटनेत सुनील दत्तात्रेय दरगोडे (३५), सुनील दरगोडे (३३) यांच्यासह राखी, आशा, माधुरी श्रावणी दरगोडे यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या ७ ते १६ वर्ष वयोगटातील सृष्टी (१६), श्रेयश (११) आणि समृद्धी (७) या मुलांचाही यात समावेश असल्याने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.