हिंदू राष्ट्रवादामुळे युद्धजन्य परिस्थिती; चीनचा आरोप

0
9

बीजिंग,21- भारतात हिंदू राष्ट्रवाद वाढत असल्याने चीन व भारत यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्लोबल टाइम्स, अन्य सरकारी वृत्तपत्रे तसेच सरकारच्या मालकीच्या टीव्ही चॅनलमधून भारतावर सतत टीका केली जात आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारात हिंदू राष्ट्रवादाचा इंधन म्हणून वापर केला होता. मोदी सत्तेत आल्यापासून भारतात मुस्लिमांवरील हिंसाचाराच्या घटनांत वाढ झाली असल्याचे सांगत हिंदू राष्ट्रवाद वाढल्यानेच भारत व चीन यांच्यात युद्धाची शक्यता बळावली आहे, असे ग्लोबल टाइम्समधील लेखात म्हटले आहे.
हिंदू राष्ट्रवादामुळे भारताची युद्धाकडे वाटचाल सुरू आहे. राजधानी दिल्लीतील परराष्ट्रविषयक सल्लागार, नेते व रणनीती आखणारे चीनविषयीचे भारताचे धोरण बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. पण चीनच्या तुलनेत भारताचे सामर्थ्य खूपच कमी आहे, असा उल्लेख लेखात आहे. डोकलाममधून भारताने आपले लष्कर मागे घ्यावे, असे चीन सातत्याने भारताला सांगत आहे. तरीही आपल्या सैन्याला माघारी न बोलावण्यास भारताची हीच रणनीती कारणीभूत आहे, असा आरोप या लेखात करण्यात आला आहे.
डोकलाममधून आपले सैनिक मागे घेणे हाच एकमेव मार्ग भारतापुढे आहे. अन्यथा त्या सैनिकांना ताब्यात घेतले जाईल वा ते मारले जातील, असे चीनचे भारतातील माजी वाणिज्यदूत लियो युवफा यांनी म्हटले आहे. युवफा हे मुंबई वाणिज्य कार्यालयात होते.
मला जो आंतरराष्ट्रीय कायदा समजतो, त्याप्रमाणे लष्करी वेषातील व्यक्ती अन्य राष्ट्राच्या सीमेत घुसते, तेव्हा त्या व्यक्तीस शत्रू मानून ताब्यात घेतले जाते वा मारले जाते. त्यामुळे अशा स्थितीत माघार घेणे हाच मार्ग असतो, असे त्यांनी म्हटले आहे.